India vs New Zealand, 2nd Test Live Update : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर प्रथमच मैदानावर उतरलेल्या विराट कोहलीची ( Virat Kohli) फलंदाजी पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांची निराशा झाली. अम्पायरच्या वादग्रस्त निर्णयामुले विराटला शून्यावर माघारी परतावे लागले. पण, मयांक अग्रवाल (Mayank Agarwal ) व शुबमन गिल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवले. विलंबानं सुरू झालेल्या या सामन्यात मयांकनं शतकी खेळी करून टीम इंडियाला मजबूत स्थितित आणले. मयांकचे हे चौथे कसोटी शतक ठरले. श्रेयस अय्यर व वृद्धीमान सहा यांची मयांकला चांगली साथ मिळाली आणि भारतानं धावांचा डोंगर उभा केला. किवींकडून अजाझ पटेलनं ( Ajaz Patel) चार विकेट्स घेतल्या.
मयांक व शुबमन गिल यांनी टीम इंडियाला दमदार सुरूवात करून दिल्यानंतर न्यूझीलंडच्या अजाझ पटेल ( Ajaz Patel) यानं सामनाच फिरवला. बिनबाद ८० धावांवरून टीम इंडियाची अवस्था ३ बाद ८० अशी केली. चेतेश्वर पुजाराला DRS मुळे जीवदान मिळूनही तो भोपळ्यावर बाद झाला. त्याच षटकात पटेलनं टीम इंडियाला मोठा धक्का दिला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पहिलाच सामना खेळणाऱ्या विराटला भोपळ्यावर माघारी जावं लागलं. २८व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पटेलनं टीम इंडियाला पहिला धक्का दिला. गिल ७१ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ४४ धावांवर झेलबाद झाला.
सातत्यानं अपयशी ठरत असलेल्या पुजाराकडे साऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. ३०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पुजारासाठी पटेलनं LBWची अपील केली. मैदानावरील पंचांनी नाबाद दिले आणि त्याविरोधात किवी खेळाडू तिसऱ्या अम्पायरकडे गेले. पण, त्यात पुजारा नाबाद असल्याचे स्पष्ट झाले अन् त्यांचा DRS वाया गेला. पण, पटेलनं टाकलेल्या पुढच्याच चेंडूवर पुजारानं पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पॅडला लागून यष्टिंवर आदळला. त्यानंतर त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर विराटसाठी LBWची जोरदार अपील झाली. त्याला बाद दिलं गेलं. तिसऱ्या अम्पायरनंही मैदानावरील अम्पायरचा निर्णय कायम राखला.
भारतीय कर्णधार सर्वाधिक सहा वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम विराटनं नावावर करताना मन्सुर अली खान पतौडी ( ५) यांचा विक्रम मोडला. कानपूर कसोटी गाजवणाऱ्या श्रेयस अय्यरनं घरच्या खेळपट्टीवर तुफान फटकेबाजी करेल असे वाटले होते. त्यानं मयांकसह चौथ्या विकेटसाठी १०६ चेंडूंत ८० धावा जोडल्या, पण त्यात श्रेयसच्या ( १८) धावांचाच हातभार लागला. अजाझनंच हा चौथा धक्का दिला. कानपूर कसोटीच्या दुसऱ्या डावात महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी करणाऱ्या वृद्धीमान सहानं मुंबई कसोटीत मयांकला तोडीसतोड साथ देताना अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या ४ बाद २२१ धावा झाल्या. मयांक २४६ चेंडूंचा सामना करताना १४ चौकार व ४ षटकारांसह १२० धावांवर, तर सहा २३ धावांवर खेळत आहेत.
संबंधित बातम्या
मुंबई कसोटीत नोंदवला गेला असा विक्रम जो १३३ वर्षांत कधीच झाला नव्हता; जाणून घ्या काय
विराट कोहलीची विकेट मैदानावरील व तिसऱ्या अम्पायरनं मिळून ढापली?; भारताच्या कर्णधारानं नाराजी व्यक्त केली, Video
अजिंक्य रहाणेची दुखापत बनावटी?; व्हायरल झालेल्या फोटोवरून उपस्थित होतेय शंका