टीम इंडियाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंजत होता. २०२५ हे वर्ष त्याच्यासाठी एका भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हते. या काळात त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक आले नाही. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात सूर्याचा जुना अंदाज पाहायला मिळाले. त्याने केवळ सुपरफास्ट अर्धशतक झळकावले नाही तर, तो आपल्या संघाला विजयी करूनच माघारी परतला. या खेळीत त्याने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि केएल राहुल यांचा खास विक्रम मोडीत काढला आहे.
सूर्यकुमारने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक षटकार मारणारा विराट कोहलीला मागे टाकत दुसरा भारतीय खेळाडू बनला आहे. या फॉरमॅटमध्ये पाठलाग करताना कोहलीने ४८ डावांमध्ये ५३ षटकार मारले आहेत. तर, सूर्यकुमारने आतापर्यंत ३६ डावांमध्ये ५४ षटकार मारले आहेत. रोहित शर्मा या यादीत अव्वल स्थानावर आहे, त्याने टी२० मध्ये पाठलाग करताना ७४ षटकार मारले आहेत. शिवाय, तो न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मध्ये भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी, हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता, ज्याने २०१७ मध्ये ४२ चेंडूत ६५ धावांची खेळी केली होती.
फॉर्मबद्दल सूर्यकुमार काय म्हणाला?
२०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये परतणे ही भारतीय संघासाठी सर्वात मोठी जमेची बाजू आहे. त्याच्या या खेळीमुळे मधल्या फळीतील भारताची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर सूर्यकुमार यादव आपल्या फॉर्मबद्दल बोलताना म्हणाला की, "मी आधी म्हटल्याप्रमाणे, मी नेटमध्ये चांगली फलंदाजी करत होतो. पण गेल्या दोन-तीन आठवड्यांत मी घरी जो वेळ घालवला, त्याने मला खूप मदत केली. क्रिकेटपासून थोडा वेळ दूर राहिल्याने आणि कुटुंब-मित्रांसोबत वेळ घालवल्याने माझी मानसिक स्थिती सुधारली. यामुळे मैदानावरील माझी निर्णयक्षमता आणि शॉट सिलेक्शन अधिक चांगले झाले आहे. मी सध्या माझ्या खेळाचा आनंद घेत आहे."
भारताचा दणदणीत विजय
न्यूझीलंडविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात भारताने सात विकेट्सने विजय मिळवत पाच सामन्याच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार मिशेल सँटनरच्या नाबाद ४७ आणि रचिन रवींद्रच्या ४४ धावांच्या मदतीने न्यूझीलंडच्या संघाने २० षटकांत सहा विकेट्स गमावून २०८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारताने १५.२ षटकांत तीन विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले. भारताकडून इशान किशनने ७६ आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने नाबाद ८२ धावांची सामना जिंकणारी खेळी केली.