अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० मालिकेतील उर्वरीत तीन सामने प्रेक्षकांविना खेळविण्यात येणार असल्याचे गुजरात क्रिकेट संघटनेने (जीसीए) कळवले. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात येत असल्याचे जीसीएचे उपाध्यक्ष धनराज नथवानी यांनी सांगितले. (Spectators barred from entering Narendra Modi stadium for 3rd T-20)
‘नरेंद्र मोदी स्टेडियमवर १६ मार्च, १८ मार्च आणि २० मार्च रोजी भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० सामने खेळविण्यात येणार असून या सामन्यांसाठी प्रेक्षकांना प्रवेश नसेल. या सामन्यांसाठी तिकिट घेतलेल्या सर्व प्रेक्षकांना पैसे परत करण्यात येतील,’ असे नथवानी यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक आणि गुजरात येथे कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले.
नथवानी पुढे म्हणाले की, ‘कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर जीसीएने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) चर्चा करत उर्वरीत सामने प्रेक्षकांविना खेळविण्याचे निश्चित केले.’ त्याचप्रमाणे, या तिन्ही सामन्यांसाठी आधीच तिकिटांची खरेदी केलेल्या क्रिकेटप्रेमींना त्यांचे पैसे परत करण्यात येईल, असेही नथवानी यांनी यावेळी स्पष्ट केले.
याआधी भारत-इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना प्रेक्षकांविना खेळविण्यात आला होता. मात्र त्यानंतरचे तीन कसोटी सामने आणि पहिले दोन टी-२० सामने स्टेडियम क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षक उपस्थितीने खेळविण्यात आले होते.