इंग्लंड दौऱ्यातील लीड्सच्या हेडिंग्लेच्या मैदानात रंगणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याआधी नवा कर्णधार शुबमन गिल याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने इंग्लंड, आस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात कसोटी मालिका जिंकणं हे आयपीएल ट्रॉफी जिंकण्यापेक्षा मोठी गोष्ट आहे, असे सांगत इंग्लंड दौरा गाजवण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे. २० जून पासून भारतीय संघ लीड्सच्या मैदानातून इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात करणार आहे. या दौऱ्याआधी पहिल्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा सल्ला घेतल्याचेही शुबमन गिलनं सांगितले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
IPL पेक्षा SENA देशांत झेंडा फडकवणं कधीही भारीच
आयपीएलमध्ये शुबमन गिल हा गुजरात टायटन्सच्या संघाचे नेतृत्व करताना दिसला होता. त्याच्या नेतृत्वाखालील यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्सच्या संघाने प्लेऑफ्सपर्यंत मजल मारली होती. याच पार्श्वभूमीवर शुबमन गिलला आयपीएल ट्रॉफी की, इंग्लंडमध्ये कसोटी जिंकणं महत्त्वाचं मानतोस? या धाटणीतील प्रश्न विचारण्यात आला होता. यावर शुबमन गिल म्हणाला की, निश्चितच कसोटी जिंकणं माझ्यासाठी अधिक महत्त्वपूर्ण आहे. इंग्लंड दौऱ्यात अधिक नेतृत्व करण्याची संधी मिळत नाही. जर तुम्ही पिढीतील सर्वोत्तम असाल तर इथं दोन किंवा जास्तीत जास्त ३ दौऱ्यात तुम्हाला नेतृत्वाची संधी मिळते. आयपीएल प्रत्येक वर्षी होते. त्यामुळे तिथं तुम्हाला प्रत्येक वर्षी संधी असते. माझ्या मते, इंग्लंड, आस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेतील मैदानातील विजय हे मोठं यश आहे.
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
आमच्याकडे 'ब्लू प्रिंट' आहे ती म्हणजे...
शुबमन गिलने यावेळी कमी अनुभवी संघाकडेही विजयाची हमी असल्याची गोष्ट बोलून दाखवली. तो म्हणाला की, अनेक जण म्हणतात की, माझ्या टीमकडे अनुभवाची कमी आहे. या गोष्टीमुळे आमच्यावर अपेक्षांचं ओझं नाही. बहुतांश खेळाडू इंग्लंडच्या मैदानात खेळलेले नाहीत. पण मागील ५-१० वर्षांत आमच्या वरिष्ठ खेळाडूंकडून आम्हाला 'ब्लू प्रिंट' दिलीये. ती म्हणजे आम्ही कोणत्याही मैदानात जिंकू शकतो, हा विश्वास. याच आत्मविश्वासाने आम्ही मैदानात उतरु, असे गिल म्हणाला आहे.
चौथ्या क्रमांकावर खेळण्याची गोष्टही अगदी स्पष्ट सांगितली
विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर त्याच्या जागी कोण खेळणार? या प्रश्नाच उत्तरही शुबमन गिलनं दिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विराट कोहली कसोटीत चौथ्या क्रमांकावरील आधारस्तंभ होता. त्याची जागा खुद्द नवा कर्णधार शुबमन गिल घेणार आहे. कोहलीच्या निवृत्तीनंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासोबत या मुद्यावर चर्चा केली. या क्रमांकावर स्वत: फलंदाजी करावी यावर आमचं एकमत झालं आहे, असे तो म्हणाला.
विराट-रोहितचा सल्ला
शुबमन गिलनं आयपीएल दरम्यान इंग्लंड दौऱ्यासंदर्भात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून सल्ला घेतल्याची गोष्टही बोलून दाखवली. तो म्हणाला की, आयपीएल दरम्यान मी या दोघांना भेटलो. इंग्लंडमधील त्यांचे अनुभव त्यांनी शेअर केले. हा सल्ला त्याला कितपत कामी येणार ते पाहण्याजोगे असेल.