मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय संघानं इंग्लंडला शंभरीच्या आत ऑल आउट करत मोठ्या विजयाची नोंद केली. पाहुण्या इंग्लंड संघाला १५० धावांनी पराभूत करत भारतीय संघानं पाच सामन्यांची मालिका ४-१ अशी आपल्या नावे केली. अभिषेक शर्माच्या विक्रमी १३५ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघानं इंग्लंडसमोर २४८ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ अवघ्या ९७ धावांत ऑलआउट झाला. इंग्लंडची पहिली विकेट घेणाऱ्या मोहम्मद शमीनंच इंग्लंडचा खेळ शंभरीच्या आत खल्लास केला. ही टीम इंडियासाठी आणखी एक आनंदाची गोष्ट ठरली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सॉल्टची फिफ्टी, बाकी सारे घडीचे प्रवासी
भारतीय संघानं सेट केलेल्या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा सलामीवीर फिलिप सॉल्ट याने तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश केला. त्याने २३ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ५५ धावांची खेळी केली. पण त्याची ही अर्धशतकी खेळी वगळता इंग्लंडच्या ताफ्यातील एकाही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. त्याच्याशिवाय जेकॉब बेथल हा एकमेव फलंदाज होता ज्यानं दुहेरी आकडा गाठला. तोही १० धावा करून तंबूत फिरला. बाकी सर्व फलंदाजांची धावसंख्या ही अगदी टेलिफोन नंबर दाखवणारी अशी ठरली.
अभिषेक शर्माची विक्रमी खेळी
टॉस गमावल्यावर पहिल्यांदा बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाच्या फलंदाजांनी सुरुवातीपासून आक्रम फलंदाजी केली. संजू सॅमसन याने जोफ्रा आर्चरच्या पहिल्या षटकात १२ धावा कुटल्या. पण तो दुसऱ्या षटकात तंबूत परतला. तो बाद झाल्यावर ठराविक अंतराने विकेट्स पडत असताना अभिषेक शर्मानं भारताकडून टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या उभारली. त्याने ५४ चेंडूत ७ चौकार आणि १३ षटकाराच्या मदतीने अनेक विक्रम प्रस्थापित करताना १३५ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय शिवम दुबेनं १३ चेंडूत ३० धावांची धमाकेदार खेळी केली. भारतीय संघानं निर्धारित २० षटकात ९ बाद २४७ धावा केल्या होत्या. इंग्लडकडून ब्रायडन कार्सनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय मार्क वूडला २ तर जोफ्रा आर्चर, जेमी ओव्हरटन आणि आदिल रशीद यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.
टीम इंडियाकडून गोलंदाजीत मोहम्मद शमी ठरला भारी
इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात सलामी जोडी फोडणाऱ्या मोहम्मद शमीनेच इंग्लंडचा खेळ खल्लास केला. इंग्लंडच्या डावातील ११ व्या षटकात शमीनं दोन विकेट्स घेत इंग्लंडचा डाव ९७ धावांवर आटोपला. शमीनं या सामन्यात भारताकडून सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय शतकवीर अभिषेक शर्मानं २ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले. उर्वरित विकेट्समध्ये शिवम दुबे आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन-दोन तर रवी बिश्नोईन एक विकेट्स घेतली.