Join us

टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुलला एकटा पडला!

अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना टीम इंडियाची खराब सुरुवात, सोपा वाटणारा सामना झाला चॅलेंजिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 23:47 IST

Open in App

IND vs ENG 3rd Test Day 4 Stumps : लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात सुरु असलेला कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. भारतीय दुसऱ्या डावात इंग्लंडचा दुसरा डाव १९२ धावांत रोखला. १९३ धावसंख्येचा पाठलाग करताना टीम इंडिया आरामात चौथ्या दिवशी या धावांचे अंतर कमी करेल, असे वाटत होते. पण सोपा वाटणारा पेपर आता अवघड झाला आहे. चौथ्या दिवसाअखेर भारतीय संघाने अवघ्या ५८ धावांवर ४ विकेट्स गमावल्या आहेत. टीम इंडियाला पाचव्या आणि अखेरच्या दिवशी विजयासाठी अजूनही १३५ धावांची गरज आहे. KL राहुल दिवसाअखेर  नाबाद राहिला एवढाच काय तो टीम इंडियासाठी दिलासा आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

दुसऱ्या डावात टीम इंडियाला धक्क्यावर धक्के

भारतीय संघाकडून यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल या जोडीनं दुसऱ्या डावाची सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या ५ धावा असताना जोफ्रा आर्चरनं दुसऱ्याच षटकात टीम इंडियाला यशस्वी जैस्वालच्या रुपात पहिला धक्का दिला. ७ चेंडू खेळून तो खातेही न उघडता माघारी फिरला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या करुण नायरनं पु्हा एकदा मैदानात तग धरला. पण ३३ चेंडूचा सामना केल्यावर तोही ब्रायजन कार्सच्या गोलंदाजीवर फसला. १४ धावांवर त्याने तंबूचा रस्ता धरला.  ब्रायडन कार्सनं शुबमन गिलच्या रुपात टीम इंडियाला तिसरा धक्का दिला. भारतीय कर्णधारानं फक्त ६ धावा केल्या. त्यानंतर अखेरच्या षटकात नाइट वॉचमनच्या रुपात आलेल्या आकाश दीपला अवघ्या एका धावेवर माघारी धाडत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनं टीम इंडियाला चौथा धक्का दिला. 

IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

लोकेश राहुल एकटा पडला!

एका बाजूनं विकेट्स पडत असताना लोकेश राहुल मैदानात संयमीरित्या संघाला सावरणारी खेळी करताना दिसून आले. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा तो ४७ चेंडूचा सामना करून ६ चौकाराच्या मदतीने ३३ धावांवर खेळत होता. पहिल्या डावातील संयमी शतकी खेळीनंतर आता पुन्हा एकदा लोकेश राहुलवर मोठी जबाबदारी असेल. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी तो पंतसह डावाला सुरुवात करेल, अशी अपेक्षा आहे. या जोडीशिवाय  रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंपर्यंत टीम इंडियाची बॅटिंग आहे. पण यांना मैदानात उतरण्याची वेळच येऊ, नये, अशीच भारतीय क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा असेल.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडलोकेश राहुलजोफ्रा आर्चरशुभमन गिलरिषभ पंत