Join us  

Ind vs Eng 3rd Test : दोन दिवसांत इंग्लंडचा खेळ खल्लास, भारताचा Day-Night कसोटीत दणदणीत विजय

India vs England 3rd Test : Day Night Test : अक्षर पटेलच्या ११ आणि आर अश्विनच्या ७ विकेट्सच्या जोरावर टीम इंडियानं तिसरी कसोटी दोन दिवसांत जिंकली,

By स्वदेश घाणेकर | Published: February 25, 2021 7:56 PM

Open in App

Ind vs Eng Pink Ball Test : भारत-इंग्लंड तिसरा कसोटी सामना दोन दिवसांत संपण्याच्या मार्गावर आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्याच कसोटीत टीम इंडियानं विजय मिळवला. या निकालानंतर खेळपट्टी ही कसोटी क्रिकेटसाठी साजेशी नव्हती असे मत व्यक्त केलं जात आहे. पहिल्या दिवशी १३ विकेट्स पडल्यानंतर, दुसऱ्या दिवशीही फिरकीपटूंनी कमाल दाखवली. दुसऱ्या दिवशी १७ विकेट्स पडल्या. इंग्लंडचा दुसरा डाव ८१ धावांवर गुंडाळल्यानंतर टीम इंडियानं ४९ धावांचे लक्ष्य १० विकेट्स राखून सहज पार केलं. या विजयासह भारतानं मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. अक्षर पटेलनं ( Axar Patel) सामन्यात ११, तर आर अश्विननं ( R Ashwin) ७ विकेट्स घेतल्या.  अक्षर पटेलची जगातल्या तगड्या गोलंदाजांना टक्कर, नरेंद्र मोदी स्टेडियमवर नोंदवला विश्वविक्रम रोहित शर्मानं खणखणीत षटकार खेचून टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. रोहित २५, तर शुबमन गिल १५ धावांवर नाबाद राहिले.

मॅचचे हायलाईट्स 

- जो रूटनं ( Joe Root) अविश्वसनीय कामगिरी करताना ६.२ षटकांत ८ धावा देत टीम इंडियाचे ५ फलंदाज माघारी पाठवले. त्यामुळे टीम इंडियाचा पहिला डाव १४५ धावांवर गडगडला आणि त्यांना ३३ धावांच्या नाममात्र आघाडीवर समाधान मानावे लागले. 

- ३ बाद ११४ वरून भारताचा डाव ८ बाद १२५ असा गडगडला. ११ धावांत टीम इंडियाचे पाच फलंदाज माघारी परतले. त्यापैकी रूटनं पहिल्या तीन षटकांत एकही धाव न देता तीन फलंदाजांना माघारी पाठवले. रिषभ पंत ( १), वॉशिंग्टन सुंदर ( ०) आणि अक्षर पटेल ( ०) हे तीन डावखुरे फलंदाज रूटच्या ऑफ स्पिन गोलंदाजीच्या जाळ्यात अडकले. त्यानंतर रुटनं आर अश्विनलाही माघारी जाण्यास भाग पाडले. 

- रुटनं ६.२ षटकांत ८ धावांत ५ विकेट्स घेतल्या. १९८२नंतर इंग्लंडच्या कर्णधारानं कसोटी क्रिकेटमध्ये केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.  या विक्रमात गुब्बी अॅलन ( ७-८० वि. भारत, १९३६), आर्थूर गिलिगॅन ( ६-७ वि. दक्षिण आफ्रिका, १९२४) व बॉब विली ( ६-१०१ वि. भारत, १९८२) यांनी हा पराक्रम केला होता.

- टीम इंडियानंही पहिल्याच षटकात इंग्लंडला दोन धक्के दिले. अक्षर पटेलनं ( Axar Patel) पहिल्याच चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॅव्ली याचा त्रिफळा उडवून आर अश्विनच्या ( R Ashwin) वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये ११४ वर्षांनंतर दुसऱ्यांदा कसोटी फिरकी गोलंदाजानं पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याचा पराक्रम केला. दोन्ही वेळेस भारतीय गोलंदाजांनी हा कामगिरी केली.

- इंग्लंडचा दुसरा डाव ८१ धावांवर गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. अक्षर पटेलनं ५ आणि आर अश्विननं ४ विकेटेस घेतल्या. भारताविरुद्धची कसोटी क्रिकेटमधील दुसरी निचांक कामगिरी ठरली. २०१५मध्ये नागपूर कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा संघ ७९ धावांवर माघारी परतला होता.

- या डावात अश्विननं बेन स्टोक्सला बाद केले. कसोटीत सर्वाधिक ११वेळा अश्विननं इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूला बाद केले आहे. अश्विननं कसोटी क्रिकेटमध्ये ४०० विकेट्सचा पल्लाही ओलांडला.  

- त्यानं ७७ कसोटीत ही कामगिरी करून सर्वात जलद ४०० विकेट घेणाऱ्या गोलंदाजांत दुसरे स्थान पटकावले. मुथय्या मुरलीधरननं ७२ कसोटीत हा पराक्रम केला. कसोटीत ४०० विकेट्स घेणारा अश्विन हा चौथा ( अनिल कुंबळे, कपिल देव व हरभजन सिंग) भारतीय गोलंदाज आहे, तर जगातला सहावा फिरकीपटू आहे. 

- भारतासमोर विजयासाठी ४९ धावांचं माफक लक्ष्य होतं आणि ते त्यांनी सहज पार करून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. शिवाय आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थान जवळपास पक्कं केलं. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडअक्षर पटेलआर अश्विन