नवी दिल्ली : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कांगारूंना त्यांच्याच भूमीवर नमवण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा सध्याचा फॉर्म पाहता भारतीय संघासाठी हे अशक्य नाही. तरीही त्यांना कमी न लेखण्याचा सल्ला भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने दिला आहे. त्याशिवाय गांगुलीने कर्णधार विराट कोहलीला फलंदाजीच्या क्रमावारी ठरवण्यासाठी विशेष सूचना केली आहे.
भारतीय कसोटी संघाची रचना पाहता मुरली विजय, लोकेश राहुल आणि पृथ्वी शॉ यांच्यापैकी दोघ सलामीला येतील, त्यानंतर चेतेश्वर पुजारा, कोहली, अजिंक्य रहाणे हे अव्वल पाच फलंदाजांच्या जागा पूर्ण करतील. यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंत संघात असेल आणि हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असल्यामुळे रोहित सहाव्या स्थानी फिट बसेल. रोहितला सलामीला न खेळवता सहाव्या क्रमावर खेळवण्याचा सल्ला दादाने दिला.