ठळक मुद्देभारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 137 धावांनी पराभव मानण्यास भाग पाडले. 41 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत दोन विजयकोहलीची परदेशात (11) सर्वाधिक विजयाच्या विक्रमाशी बरोबरी
मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाला 137 धावांनी पराभव मानण्यास भाग पाडले. भारताच्या 399 धावांचा पाठलाग करताना कांगारूंचा दुसरा डाव 261 धावांवर आटोपला. जसप्रीत बुमराने सामन्यात ( 6/33 व 3/53) नऊ विकेट घेत विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याला मॅन ऑफ दी मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले. या कामगिरीसह भारताने कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. भारताचा हा 150 वा कसोटी विजय ठरला. आशियाई देशांमध्ये अशी कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला आहे.
बॉक्सिंग डे कसोटीत भारताने चौथ्याच दिवशी विजय साजरा केला असता, परंतु पॅट कमिन्सने तो लांबणीवर टाकला. त्यात पाचव्या दिवसाचे पहिले सत्र पावसामुळे वाया गेल्याने भारतीय निराश झाले, परंतु पाऊस थांबला, खेळ सुरू झाला आणि अवघ्या काही मिनिटांतच भारताने कांगारूंचा डाव गुंडाळला. भारताने 41 वर्षांनंतर प्रथमच ऑस्ट्रेलियात दोन कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम केला. यापूर्वी बिशनसिंग बेदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1977-78 च्या मालिकेत दोन कसोटी विजय मिळवले होते. तसेच मेलबर्नवरील भारताचा हा ( 1978 व 1981) तिसरा विजय ठरला.
भारताचा हा 150 वा कसोटी विजय ठरला. या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया 384 विजयांसह आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ इंग्लंड ( 364), वेस्ट इंडिज ( 174), दक्षिण आफ्रिका ( 162) आणि भारत ( 150) यांचा क्रमांक येतो.