Join us  

चांगली कामगिरी करत असतील, तर रवी शास्त्रींना का हटवावे? कपिलदेव यांचा प्रश्न

चांगली कामगिरी करत असतील, तर रवी शास्त्रींना का हटवावे? कपिलदेव यांचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 9:42 AM

Open in App

नवी दिल्ली : ‘प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री जर चांगले निकाल देत असतील, तर त्यांना भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरून का दूर करावं. त्यांना प्रशिक्षक पदावरून हटविण्याचे कोणते कारणच दिसून येत नाही,’ असे मत भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केले.यंदाच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. यानंतर पुन्हा ते प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणार की नाही, यावर त्यांचा कार्यकाळ अवलंबून राहील. त्याचवेळी, दुसरीकडे अशीही चर्चा रंगत आहे की, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) संचालक राहुल द्रविड यांची भारताच्या मुख्य संघाच्या प्रशिक्षकपदी वर्णी लागू शकते. सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या दुसऱ्या श्रेणीच्या संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी द्रविड यांच्यावर आहे.एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना कपिलदेव म्हणाले की, ‘भारताच्या प्रशिक्षक पदाविषयी चर्चा करण्याची ही आता वेळ नाही असे मला वाटते. श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाची कामगिरी कशी होते, हे आधी पाहिले पाहिजे. नवीन प्रशिक्षक तयार करण्यात वाईट काहीच नाही; पण जर रवी शास्त्री चांगली कामगिरी करत असतील, तर त्यांना हटविण्याचे कारण दिसून येत नाही. यामुळे प्रशिक्षक आणि खेळाडूंवर विनाकारण दबाव येतो.’ 

टॅग्स :कपिल देवरवी शास्त्रीभारतीय क्रिकेट संघ