साऊथम्पटन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून खेळल्या जाणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वेगवान आणि उसळी घेणारी खेळपट्टी तयार करण्याचा मानस साऊथम्पटन मैदानाचे क्यूरेटर सायमन ली यांनी व्यक्त केला आहे. खेळपट्टीवर फिरकीपटूदेखील यशस्वी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त
केला.
‘हे तटस्थ स्थळ असल्याने आयसीसीच्या निर्देशांचे पालन करीत खेळपट्टी तयार करणे सोपे होईल. मात्र, दोन्ही संघांना लाभ होईल, अशी खेळपट्टी तयार करण्याची आमची इच्छा आहे. माझे मत विचाराल तर मी वेग आणि उसळी घेणारी खेळपट्टी बनवू इच्छितो’, असे ली म्हणाले.
n ‘इंग्लंडमध्ये जूनमध्ये बऱ्याचवेळा पाऊस हजेरी लावतो. तथापि या सामन्यादरम्यान संपूर्ण दिवस ऊन असेल, असे हवामान खात्याने भाकीत केले आहे. त्यामुळे उसळी आणि वेग असलेली खेळपट्टी तयार केली जाईल. दोन्ही संघांकडे जागतिक दर्जाचे दिग्गज गोलंदाज असल्याने क्षणोक्षणी या गोलंदाजांचे कौशल्य पाहायला मिळणार आहे. लाल चेंडूच्या खेळात वेग हा रोमांचक ठरतो. फलंदाजी असो वा गोलंदाजी प्रत्येक चेंडूवर चुरस अनुभवायला मिळावी, या हेतूने मी खेळपट्टी तयार करण्याचा विचार करीत आहे. फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात कौशल्याचे युद्ध झाल्यास निर्धाव षटक फारच मोलाचे ठरते. खेळपट्टीवर वेग आणि उसळी असेल तर उच्च दर्जाच्या क्रिकेटचे दर्शन घडू शकेल’, असे मत ली यांनी व्यक्त केले.
फिरकीत भारताचे पारडे जड
n फिरकी गोलंदाजीत भारताचे पारडे जड आहे. रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा हे जागतिक दर्जाचे फिरकीपटू आहेत. सामना पुढे सरकला की, फिरकी गोलंदाजांची भूमिका निर्णायक ठरेल. हवामानाचा अंदाज चांगला असून, येथील खेळपट्ट्या लवकर कोरड्या होतात. याचे कारण मातीत असलेले बजरीचे मिश्रण. अशावेळी फिरकी गोलंदाजदेखील सामना फिरविण्यास निर्णायक भूमिका बजावू शकतात’, असे ते म्हणाले.
आयसीसीकडून बक्षिसांचा वर्षाव
n फायनल जिंकणाऱ्या संघाला ११.७ कोटी आणि मानाची गदा तर उपविजेत्या संघास ५.८५ कोटी रुपये रक्कम मिळणार आहे. याशिवाय तिसऱ्या स्थानावरील ऑस्ट्रेलियाला ३.३ कोटी, इंग्लंड २.५ कोटी आणि पाकिस्तानला १.५ कोटी मिळतील. अन्य संघांना प्रत्येकी ७३ लाख रुपये दिले जाणार आहेत.
साऊथम्पटनचा
रेकॉर्ड
एकूण कसोटी : ६, धावा : ५२३४, विकेट : वेगवान गोलंदाज : १२० बळी, फिरकीपटू : ४१ बळी. सर्वोच्च धावा : ८ बाद ५८३ (इंग्लंड वि. पाकिस्तान ऑगस्ट २०२०), नीचांकी धावा : सर्वबाद १७८ (भारत वि. इंग्लंड जुलै २०१४.) आधी फलंदाजी करणारा संघ दोनदा, तर नंतर फलंदाजी करणारा संघ एकदा येथे जिंकला.