मँचेस्टर : ‘टी२० मध्ये शानदार फलंदाजी करणाऱ्या आंद्रे रसेलसह कॅरेबियन फलंदाजांसाठी भारताविरुद्धच्या सामन्यात वेगळ्या प्रकारचे दडपण राहील,’ असे मत भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलने व्यक्त केले. वेस्ट इंडिज संघ उपांत्य फेरी गाठण्याच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर फेकला गेला आहे आणि रसेलच्या दुखापतीमुळे त्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे.
आतापर्यंत विश्वचषकातील चार सामन्यांत सहापेक्षा कमी धावांच्या सरासरीने सात बळी घेणारा चहल म्हणाला,‘आम्ही रणनीती तयार केली आहे. रसेल आक्रमक फलंदाज आहे, पण आम्ही त्याला बरीच गोलंदाजी केली आहे. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे आणि आयपीएलमध्ये खेळणे वेगळे आहे. यात सामना जिंकण्याचे दडपण आमच्यावर जेवढे असेल तेवढेच दडपण त्याच्यावरही असेल. तो विजयासाठी आतूर असून फॉर्म मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. येथील परिस्थिती एकदम वेगळी आहे.’ दुखापतीमुळे रसेलला न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत खेळता आले नव्हते. चहल म्हणाला, ‘रसेल चार फलंदाज बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर येतो. अशा स्थितीत कसे खेळायचे, याची त्याला कल्पना आहे. आम्हीही सामन्यातील परिस्थितीनुसार रणनीती तयार करू.’ (वृत्तसंस्था)
चहलने अर्धशतक करणाºया केदार जाधवची प्रशंसा करताना म्हटले की, ‘फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर केदारची फलंदाजी शानदार होती. आम्ही २७० पर्यंत मजल मारू असे वाटत होते, पण अफगाण गोलंदाजांनी अचूक मारा केल्याने ३०-४० धावा कमी झाल्या. आमचे लक्ष्य जास्तीत जास्त निर्धाव चेंडू टाकण्याचे होते.’