India vs Namibia, 18th Match : दिल्लीच्या अरुण जेटलीच्या मैदानात रंगलेल्या नामिबियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने ईशान किशन आणि संजूच्या धमाकेदार फटकेबाजीसह दमदार सुरुवात केली. संजू ८ चेंडूत २२ धावा करून परतल्यावर ईशान किशनने अवघ्या २० चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या या धमाकेदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने अवघ्या ४१ चेंडूत धावफलकावर १०० धावा लावल्या. टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासातील एखाद्या संघाने सर्वात जलद शंभर धावा करण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावे झाला. पण अखेरच्या दोन षटकात टीम इंडियाने १० धावांत ५ विकेट्स गमावल्या अन् निर्धारित षटकात भारतीय संघ ९ बाद २०९ धावांपर्यंतच मजल मारु शकला. नामिबियासाठी हे आव्हान पार करणे सोपे नाही. पण टीम इंडियाने मोठ्या धावसंख्येची आशा असताना मोठी निराशा केल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अखेरच्या दोन षटकात ५ विकेट्स अन् फक्त १० धावा
ईशान किशन याने २४ चेंडूत ६१ धावांची धमाकेदार खेळी केल्यावर हार्दिक पांड्यानेही अर्धशतक साजरे केले. २८ चेंडूच ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने तो ५२ धावा करून तंबूत परतला. त्याची विकेट पडल्यावर भारतीय संघाने एकमागून एक विकेट गमावल्या. नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मुस घेऊन आलेल्या १९ व्या षटकात टीम इंडियाने ७ धावांत ३ विकेट गमावल्या. अखेरच्या षटकातही विकेटचा सिलसिला सुरुच राहिला. या षटकात ३ धावांत टीम इंडियाने २ विकेट्स गमावल्याचे पाहायला मिळाले.
IND vs NAM : ईशान किशनचा 'शानदार' शो! २० चेंडूत अर्धशतक साजरे करत खास विक्रमाला गवसणी
तिलक वर्मासह सूर्यादादाही स्वस्तात परतला, अखेरच्या षटकात रिंकूचाही जलवा नाही दिसला
अभिषेक शर्माच्या जागी संधी मिळालेल्या संजू सॅमसन याने दमदार सुरुवात केली. पण ८ चेंडूत त्याचा खेळ खल्लास झाला. संघाच्या धावफलकावर २५ धावा असताना २२ धावा करून त्याने तंबूचा रस्ता धरला. तिलक वर्मा आणि ईशान किशन जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी ३१ चेंडूत ७९ धावा केल्या. १०४ धावांवर भारतीय संघाला ईशान किशनच्या रुपात दुसरा धक्का बसला. तिलक वर्मानं २१ चेंडूत १५ धावा केल्या. सूर्यकुमार यादव नामिबियाविरुद्ध फार मोठी खेळी करू शकला नाही. त्याने फक्त १२ धावांची भर घातली. शिवम दुबेनं रन आउटच्या रुपात विकेट गमावण्याआधी १६ चेंडूत २३ धावांची खेळी केली. यात एक षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता.