आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत आज होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये यजमान भारत आणि इंग्लंडचे संघ आमने सामने येणार आहेत. या स्पर्धेत दोन्ही संघांची कामगिरी संमिश्र झाली असून, आज होणाऱ्या सामन्यात सर्वोत्तम खेळ करून अंतिम फेरी गाठण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. मात्र वानखेडेवर इंग्लंडविरुद्ध खेळतानाच्या अनेक कटू आठवणी टीम इंडियाच्या मनात असतील. क्रिकेटच्या इतिहासात डोकावून पाहिले तर १९८७ साली भारतात झालेल्या क्रिकेच विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारत आणि इंग्लंडचे संघ वानखेडेवर आमने सामने आले होते. मात्र त्या लढतीत इंग्लिश संघाने भारताला पराभवाचा धक्का दिला होता.
क्रिकेट विश्वचषक आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतींमध्ये वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाची कामगिरी तितकीशी चांगली झालेली नाही. भारतीय संघ येथे आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेचे तीन उपांत्य सामने खेळला आहे. त्यातील २ सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. तर एकदा विजय मिळाला आहे. १९८७ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत वानखेडेवर इंग्लंडविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात आणि २०१६ साली टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात भारताचा पराभव झाला होता. तर २०२३ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता.
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंडचे संघ वानखेडे स्टेडियमवर दुसऱ्यांदा आमने-सामने येत आहेत. याआधी १९८७ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंडच्या संघांमध्ये वानखेडेवर उपांत्य सामना रंगला होता. तेव्हा ग्रॅहम गुचच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने ५० षटकांत २५४ धावा कुटल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ ४५.३ षटकांत अवघ्या २१९ धावांवर गारद झाला होता. त्यामुळे आज भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कशी कामगिरी करतो याबाबत उत्सुकता असेल.
दरम्यान, यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंडच्या संघांची कामगिरी तितकीशी प्रभावी झालेली नाही. दोन्ही संघांनी अडखळत धडपडत उपांत्य फेरी गाठली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या लढतीत जो संघ चांगली कामगिरी करेल, तोच बाजी मारण्यात यशस्वी ठरेल,अशी शक्यता आहे.
आज रात्री होणाऱ्या सामन्यापूर्वी वानखेडेच्या खेळपट्टीवर काही प्रमाणात गवत दिसून येत आहे. त्यामुळे हा सामना हाय स्कअरिंग होण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे याआधी येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्माने शतकी खेळी केली होती. मात्र विश्वचषक स्पर्धेतील सामन्याचा दबाव हा वेगळाच असतो. तसेच आजच्या लढतीतही हा दबाव मोठ्या प्रमाणावर दिसू शकतो.
Web Summary : India faces England in the T20 World Cup semi-final at Wankhede. Memories of the 1987 World Cup loss linger. Both teams aim for the final after mixed performances. Expect a high-scoring match with pressure on both sides.
Web Summary : भारत का टी20 विश्व कप सेमीफाइनल में वानखेड़े में इंग्लैंड से मुकाबला। 1987 विश्व कप की हार की यादें ताज़ा। दोनों टीमें मिश्रित प्रदर्शन के बाद फाइनल में जगह बनाने का लक्ष्य रखेंगी। दोनों टीमों पर दबाव के साथ एक उच्च स्कोरिंग मैच की उम्मीद।