दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) तक्रार निवारण समितीने मंगळवारी बीसीसीआयविरुद्ध पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा (पीसीबी) नुकसान भरपाईचा दावा फेटाळला. त्यामुळे प्रदीर्घ कालावधीपासून सुरू असलेला हा वाद संपुष्टात आला.
पीसीबीने भारतीय क्रिकेट बोर्डावर द्विपक्षीय मालिकेबाबतच्या सहमती पत्राचा (एमओयू) आदर न करण्याचा आरोप केला होता. आयसीसीने आपल्या अधिकृत टिष्ट्वटर पोस्टवर लिहिले की, ‘तक्रार निवारण समितीने बीसीसीआयविरुद्धचा पाकिस्तानचा आरोप फेटाळून लावला आहे. हा निर्णय बंधणकारक राहणार असून याविरुद्ध अपील करता येणार नाही.’
पीसीबीने बीसीसीआयवर ४४७ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती. बीसीसीआयने म्हटले, ‘हे कथित एमओयू स्वीकारण्यास आम्ही बाध्य नाही. भारताने सुचविलेल्या आयसीसी महसूल मॉडेलच्या समर्थनाची प्रतिबद्धता पाकने पूर्ण केली नाही. पाकसह मालिका खेळण्यासाठी सरकारची मंजुरी आवश्यक असते. मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर पाक दौऱ्यासाठी सरकारची परवानगी मिळालेली नाही.’ (वृत्तसंस्था)
पाकिस्तान क्रिकेट मंडळाने बीसीसीआयने पाकसह खेळण्याचा करार भंग केला, असा दावा केला होता. त्यासाठी तत्कालीन सचिव संजय पटेल यांनी दिलेल्या पत्राचा पाकने दाखला दिला. दुबई येथे आॅक्टोबरमध्ये भारताकडून अॅड. शशांक मनोहर, तत्कालीन कायदामंत्री सलमान खुर्शीद, प्रा. रत्नाकर शेट्टी व बीसीसीआयचे तत्कालीन सचिव संजय पटेल यांनी साक्ष नोंदविली. सदरचे पत्र हा करार होऊ शकत नाही, तसेच राजकीय परिस्थिती व अशांतता यामुळे भारत सरकारने बीसीसीआयला पाकमध्ये खेळण्यास परवानगी दिली नाही, असा युक्तिवाद करण्यात आला. तो चौकशी समितीने ग्राह्य धरला.
-अॅड. अभय आपटे,
बीसीसीआय कायदा समितीचे माजी सदस्य