यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन पाकिस्तान करत आहे, मात्र, टीम इंडिया या स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाण्याच्या तयारीत नाही. या परिस्थितीत आशिया चषक 2023 प्रमाणे, हायब्रीड मॉडेलवर विचार केला जात आहे. यातच आता, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने मोठे विधान केले आहे. टीम इंडियाचे पाकिस्तानात येणे बीसीसीआयवर नाही, तर भाजप सरकारवर अवलंबून असल्याचे, शोएबने म्हटले आहे.
एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखती शोएब म्हणाला, "हे सरकारवर अवलंबून आहे. याच्याशी बीसीसीआयचे काहीही देणेघेणे नाही. हे भाजप सरकारवर अवलंबून आहे. ते ठरवतील. पडद्यामागे चर्चा होईल. एवढेच नाही तर, युद्धाच्या काळातही पडद्यामागे चर्चा होत असतात. आपण आशा कायम ठेवायला हव्यात. आपण समाधानाकडे बघायला हवे. 95-98 टक्के स्पॉन्सरशिप भारताकडून येते हे आपल्याला माहीत आहे."
अख्तर पुढे म्हणाला. "जर पाकिस्तान भारताला पाकिस्तानात येण्यासाठी पटवू शकला नाही, तर दोन गोष्टी होतील, एक म्हणजे, आयसीसीला जाणारी आणि आयोजक देशाला मिळणारी 100 मिलियन डॉलरची स्पॉन्सरशिप आपण गमावू. तसेच, दुसरे म्हणजे, भारताने येथे येऊन खेळणे चांगले होईल. मात्र, हे पूर्ण पणे सरकारवर अवलंबून आहे. याचा बीसीसीआयशी काहीही संबंध नाही."
अख्तर पुढे म्हणाला, पाकिस्तानला असा टॅग लागला आहे की, तो वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या मोठ्या स्पर्धांचे आयोजन करू शकत नाही. आशा ठेवऊयात, शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघूयात, आपण मला आता विचाराल, तर मी म्हणेन, भारत येत आहे."