आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं २०२६ मध्ये होणाऱ्या महिला टी-२० वर्ल्ड कपसाठी विक्रमी बक्षीस रकमेची घोषणा केली आहे. इंग्लंड अँण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाच्या यजमानपदाखाली होणाऱ्या स्पर्धेसाठी एकूण बक्षीसाची रक्कम सुमारे ८१.८३ कोटी इतकी ठेवण्यात आली आहे. २०२४ च्या तुलनेत बक्षीस रक्कमेत १० टक्के वाढ करण्यात आल्याचे दिसते. महिला क्रिकेटमधील वाढती लोकप्रियता आणि प्रभावी कामगिरी पाहून ICC नं हा मोठा निर्णय घेतला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विजेत्यांवर होणार पैशांचा वर्षाव
या स्पर्धेतील विजेत्या संघाला २,३४०,००० अमेरिकन डॉलर (सुमारे २१.८ कोटी) इतकी मोठी रक्कम मिळणार आहे. उपविजेत्या संघाला १,११७०,००० अमेरिकन डॉलर (सुमारे १० कोटी रुपये) दिले जातील. सेमीफायनलमध्ये पराभूत होणाऱ्या प्रत्येक संघाला ६७५,००० अमेरिकन डॉलर (सुमारे ६.२९ कोटी रुपये) मिळतील. तसेच साखळी फेरीतील प्रत्येक विजयासाठी संघांना ३१,१५४ अमेरिक डॉलर (सुमारे २९ लाख रुपये) रक्कम बोनस स्वरुपात दिली जाईल.
कधी पासून रंगणार ही स्पर्धा?
२०२६ चा महिला टी-२० वर्ल्ड कप ऐतिहासिक ठरणार आहे, कारण पहिल्यांदाच या स्पर्धेत १० ऐवजी १२ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेची सुरुवात १२ जून २०२६ रोजी इंग्लंड आणि श्रीलंका महिला संघातील लढतीनं होणार आहे. एकूण २४ दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडसह १२ संघ ७ वेगवेगळ्या मैदानांवर ३३ सामने खेळणार आहेत.
लॉर्ड्सवरून ट्रॉफी टूरची सुरुवात
क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवरुन ट्रॉफी टूरची शानदार सुरुवात करण्यात आली. ऐतिहासिक पॅव्हेलियनवर लाइट प्रोजेक्शनद्वारे ट्रॉफीचे प्रदर्शन करण्यात आले. ही ट्रॉफी आता स्कॉटलंड, नेदरलँड्स, आयर्लंड आणि इंग्लंडमधील प्रमुख शहरांमध्ये फिरणार आहे.
महिला क्रिकेटसाठी मोठा टप्पा
स्पर्धेच्या संचालिका बेथ बॅरेट-वाइल्ड यांच्या मते, हा स्पर्धा महिला क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक पाहिला जाणारा ठरू शकतो. ICC चे सीईओ संजोग गुप्ता यांनीही१२ संघांचा विस्तार आणि वाढीव गुंतवणूक यामुळे स्पर्धा अधिक स्पर्धात्मक होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
‘वुमन इन ब्लू’ सज्ज
हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने वनडे वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून इतिहास रचला आहे. आता त्यांच्या नजरा पहिली वहिली टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्यावर असेल.