नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने आपल्या वनडे कारकिर्दीबाबत सुरू असलेल्या अफवांना पूर्णविराम देत आपण २०२७ चा वनडे विश्वचषक खेळणार असल्याची गुरुवारी घोषणा केली. टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेला ३८ वर्षांचा रोहित आता केवळ वनडे प्रकारात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे.
२०२७ मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या विश्वचषकाच्या वेळी रोहित ४० वर्षांचा असेल. मात्र, त्याने स्पष्ट केले की, संघासोबत विश्वचषक ट्रॉफी उचलणे हेच आपले अंतिम ध्येय असेल आणि त्यासाठी स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास सज्ज आहे. ‘आयसीसी’ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात रोहित पुढे म्हणाला, ‘मी विश्वचषक खेळून माझ्या देशासाठी जेतेपद पटकावू इच्छितो. हे स्वप्न मी बालपणापासून जोपासले आहे. मी वनडे विश्वचषक पाहत मोठा झालो आहे. तेव्हा टी-२० विश्वचषक किंवा आयपीएल नव्हते. प्रत्येक चार वर्षांनी होणारा वनडे विश्वचषकच क्रिकेटचे शिखर मानले जायचे. मला ती ट्रॉफी हवी आहे. त्यामुळे माझ्या ताकदीनुसार आणि क्षमतेनुसार मी कठोर परिश्रम करीन आणि ती जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करीन.’
रोहितची वनडे कामगिरी
सामने : २८२, धावा : ११५७७, सर्वोच्च : २६४, सरासरी : ४८.८४, स्ट्राइक रेट : ९२.७४, शतके : ३३, अर्धशतके : ६१.
रोहित ‘ग्रेड-ब’मध्ये
‘बीसीसीआय’ने खेळाडूंचा वार्षिक करार नुकताच जाहीर केला. त्यात रोहितला ‘ब’ श्रेणीत स्थान दिले. याआधी त्याला ‘अ’ प्लस श्रेणीत ७ कोटी रुपये वार्षिक मानधन मिळत होते. नवीन करार मागील सत्रातील कामगिरी आणि खेळलेल्या सामन्यांच्या संख्येच्या आधारे ठरविण्यात आला आहे.
तयारी आणि फिटनेसची कसोटी
रोहित शर्मासमोर सर्वांत मोठे आव्हान म्हणजे वय आणि फिटनेस हेच असेल. २०२७ पर्यंत तो ४० वर्षांचा होईल. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, रोहित सध्याचा फॉर्म आणि फिटनेस टिकवून ठेवू शकला तर २०२७ मध्ये भारतासाठी सलामीवीराची जबाबदारी समर्थपणे पार पाडू शकतो.