Join us  

HERO, हे फक्त चार शब्द नाहीत... विंग कमांडर अभिनंदन यांच्यासाठी सचिन तेंडुलकरचा खास संदेश

बीसीसीआयसह सेहवाग, गंभीर, रैना, अश्विन यांनीही दिल्या शुभेच्छा.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2019 3:14 PM

Open in App

मुंबई : इंडियन एयरफोर्स विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे भारतात परतले आणि साऱ्यांनी एकच जल्लोष केला. भारतात परतलेल्या या वाघाचे साऱ्यांनीच जोरदार स्वागत केले. भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अन्य खेळाडडूंनीही ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्य केल्या आहेत.

सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " HERO, हे फक्त चार शब्द नाहीत. या चार शब्दांपेक्षा HERO फार मोठा असतो. हिरो तो असतो जो तुम्हाला स्वत:वर विश्वास ठेवायला शिकवतो. #WelcomeHomeAbhinandan Jai Hind. "

 पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान भारतात सुखरुप परतले. अभिनंदन वर्धमान यांनी दाखवलेल्या शौर्याचा अभिमान सर्वच भारतीयांना आहे. शुक्रवारी रात्री सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानने अभिनंदन वर्धमान यांना वाघा बॉर्डरहून भारताच्या स्वाधीन केले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण देश सज्ज होता.

बीसीसीआयने या वीरपुत्रला अनोखी सलामी दिली आहे. बीसीसीआयकडून शुक्रवारी भारतीय संघासाठी नवीन जर्सी लॉन्च करण्यात आली. या जर्सीवर विंग कमांडर अभिनंदन यांचे नाव लिहिले आहे आणि जर्सीचा नंबर एक आहे. दरम्यान, ही जर्सी परिधान करुन भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहे. सध्या ही जर्सी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बीसीसीआयने ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, 'अभिनंदन तुझे मायदेशी स्वागत आहे. तू आकाशावर राज्य करतो. त्याचप्रमाणे तू आमच्या सर्वांच्याच ह्दयावरही राज्य करतो. तुझे धैर्य आणि शौर्य येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल.'

दरम्यान, 14 फेब्रुवारी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर  भारतीय हवाई दलाच्या विमानांनी मंगळवारी (26 फेब्रुवारी) पहाटे पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने बुधवारी (27 फेब्रुवारीला) सकाळी भारतात घुसखोरी केली. यावेळी पाकिस्तानच्या विमानांना पिटाळून लावताना भारताचे मिग-21 लढाऊ विमान कोसळले असता विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पॅराशूटद्वारे खाली उडी मारली. मात्र,अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या हद्दीत गेले. त्यावेळी त्यांना पाकिस्तानच्या लष्कराने ताब्यात घेतले. अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेची आग्रही मागणी भारताने केली होती. त्यानंतर पाकिस्तानने शुक्रवारी रात्री अभिनंदन वर्धमान यांना भारताकडे सुपूर्द केले.

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे तीन दिवसांनंतर पाकिस्तानातून भारतात परतले आहेत. सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाकिस्ताननं अभिनंदन यांना भारताच्या स्वाधीन केलं आहे. हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या आई-वडिलांनी अटारी बॉर्डरवर हजर राहून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं भारतात स्वागत केलं आहे. वर्धमान यांना आणण्यासाठी हवाई दलाच्या 5 गाड्यांचा ताफा अटारी बॉर्डरवर गेला होता. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासाठी वाघा बॉर्डरवरील बीटिंग रिट्रीट सोहळा रद्द करण्यात आला. 

भारतीय हवाई दलाच्या विमानांनी मंगळवारी (26 फेब्रुवारी) पहाटे पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकने बुधवारी (27 फेब्रुवारीला) सकाळी भारतात घुसखोरी केली होती. पाकच्या विमानांना पिटाळून लावताना मिग-21चे विंग कमांडर पाकच्या हद्दीत शिरले होते. तेथे त्यांचे विमान पाडण्यात आले. पण त्यांनी लगेच पॅराशूटद्वारे खाली उडी मारली. मात्र स्थानिकांनी त्यांना पोलिसांच्या व नंतर लष्कराच्या ताब्यात दिले. त्यांच्या सुटकेची आग्रही मागणी भारताने केली होती. त्यानंतर पाकिस्ताननं अभिनंदन वर्धमान यांना भारताकडे सुपूर्द केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही यासाठी प्रचंड दबाव येत होता. अभिनंदन यांना ताब्यात घेतल्यानंतर इम्रान खान यांनी भारतापुढे शांततेचा प्रस्ताव ठेवला. तसेच पंतप्रधान मोदी यांना बुधवारी संध्याकाळी फोन केला. पण मोदी यांनी त्यांचा फोन घेतला नाही. आधी अभिनंदन यांची सुटका व नंतरच चर्चा वा वाटाघाटी होतील, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळे इम्रान खान यांना अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा करण्याखेरीज पर्यायच राहिला नाही. इम्रान खान यांनी अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा करत त्यांना भारताकडे सोपवलं आहे.

टॅग्स :अभिनंदन वर्धमानसचिन तेंडुलकरविरेंद्र सेहवागबीसीसीआयगौतम गंभीर