लंडन - महिला वन डे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत ऑस्ट्रेलियासारखा बलाढ्य प्रतिस्पर्धी समोर असतानाही या फलंदाजाने धावांचा धो धो पाऊस पाडला आणि भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. हरमनप्रीत सिंगच्या 115 चेंडूंवरील 171 धावांच्या त्या अविस्मरणीय खेळीला आज ( शुक्रवारी) बरोबर एक वर्ष पूर्ण होत आहे आणि विस्डन इंडियाने त्या आठवणीला उजाळा दिला आहे. भारतीय महिला वन डे क्रिकेट इतिहासातील ही एक सर्वोत्तम खेळी आहे.
प्रथम फलंदाजी करणा-या भारतीय संघाची सलामीची जोडी अवघ्या 35 धावांवर माघारी परतताल्यानंतर कर्णधार मिताली राज आणि हरमनप्रीत यांनी संघाला सुस्थितीत आणले. दोघींनी अर्धशतकी भागीदारी केली, परंतु मिताली परतल्यानंतर हरमनप्रीतने सामन्याची सूत्रे हाती घेतली. 27व्या षटकात अर्धशतक पूर्ण करताचे तिने हवेत उंच उडी मारली आणि जल्लोष केला. त्यानंतर तिने तुफान फटकेबाजी केली आणि 35व्या षटकात शतकही झळकावले.
त्यानंतरही तिची फटकेबाजी सुरूच राहिली. तिने 20 चौकार आणि 7 षटकार खेचत नाबाद 171 धावा केल्या. तिच्या या मॅरेथॉन खेळीच्या जोरावर भारताने 42 षटकांत 4 बाद 281 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 40.1 षटकांत 245 धावांवर तंबूत परतला. अंतिम फेरीत मात्र भारताला यजमान इंग्लंडकडून हार पत्करावी लागली होती. अवघ्या नऊ धावांनी भारतीय महिलांना जेतेपदाने हुलकावणी दिली होती.