ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पाच सामन्यांच्या मालिकेत जसप्रीत बुमराहनं 'वन मॅन आर्मी' शो दाखवला. एका बाजूनं तो भेदक मारा करून कांगारुंवर भारी पडला. दुसऱ्या बाजूला स्टार फलंदाजांनी नांगी टाकली. परिणामी जस्सीनं घेतलेली सगळी मेहनत वाया गेली. टीम इंडियावर मालिका गमावण्याची वेळ आली. ही मालिका संपल्यावर आता माजी क्रिकेटर हरभजन सिंगनं टीम इंडियावर निशाणा साधला आहे. जसप्रीत बुमराहला दिलेला ताण अन् भारतीय संघाची टर्निंग पिचवर खेळण्याची वाईट खोडं याकडे बोट दाखवत त्याने टीम इंडियाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नाव मोठं लक्षण खोटं; नाव न घेता रोहित-विराटचा घेतला समाचार
हरभजन सिंग आपल्या यु ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियातील भारतीय संघाच्या कामगिरीवर व्यक्त झाला आहे.'मन उदास झालं आहे. भारतीय संघाकडून खूप अपेक्षा होत्या. पण या मालिकेत नाव मोठं लक्षण खोटं असं चित्र दिसून आले, अशा शब्दांत त्याने स्टार फलंदाजांच्या ढिसाळ कामगिरीचा समाचार घेतला. टर्निंग पिचवर खेळण्याची सवय कधी सोडणार आहात? असा प्रश्न त्याने पुन्हा एकदा उपस्थितीत केला. ही सवय चांगल्या पिचवर खेळताना टीम इंडियाला महागात पडते, असेही तो म्हणलाा आहे.
बुमराहला पिळून काढलं; त्यानं किती षटकं टाकायची?
संपूर्ण मालिकेत फक्त जसप्रीत बुमराहचा जलवा पाहायला मिळाला. ज्याने जीव तोडून गोलंदाजी केली. ऊसातून रस काढतो तसं बुमराहला पिळून काढलं. ट्रॅविस हेड आला की, चेंडू बुमराहकडे द्या..., मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ आला की बोलवा बुमराहला... आरे यार बुमराहनं किती ओव्हर टाकायच्या? बुमराहची अशी अवस्था केली की शेवटी संघाला त्याच्याशिवाय खेळण्याची वेळ आली.
बुमराह नसता तर ५-० असा पराभव झाला असता
संघ फक्त अन् फक्त बुमराहच्या एकट्याच्या जोरावर मालिका खेळला. जर बुमराह या दौऱ्यावर संघाचा भाग नसता तर भारतीय संघाने ही मालिका ५-० अशी गमावली असती, असेही भज्जी म्हणाला आहे. जसप्रीत बुमराहनं या मालिकेत ३२ विकेट्स घेत अनेक विक्रम प्रस्थापित केले. पण शेवटच्या डावात पाठीच्या दुखापतीमुळे तो गोलंदाजी करू शकला नाही.
Web Title: Harbhajan Singh SaysJasprit Bumrah Ko Ganne Ki Tarah Nichod Diya after Ind vs Aus Border Gavaskar Trophy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.