इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पुन्हा एकदा टीकेचा धनी ठरला आहे. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर टीम इंडियाला घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका फक्त २-० ने जिंकता आली. त्यानंतर टीम इंडियाला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध ३-० ने पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिला सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने पुढील तिन्ही सामने गमावले. दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये सतत होणाऱ्या पराभवांमुळे भारतीय क्रिकेट चाहते निराश झाले आहेत.
आता इंग्लंडमधील पाच सामन्यांच्या मालिकेतही टीम इंडिया १-० ने पिछाडीवर आहे. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली असली तरी लाल चेंडू हा क्रिकेटचा खरा फॉरमॅट मानला जातो. गंभीरने स्वतः अनेक वेळा कसोटी सामन्यांचे महत्त्व सांगितले. त्यामुळे गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. टीम इंडियाने गेल्या वर्षी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिका जिंकल्यानंतर नऊ कसोटी सामने खेळले आणि फक्त एकच सामना जिंकला.
गंभीरच्या देखरेखीखाली टीम इंडियाने गेल्या आठ मालिकांपैकी पाच मालिका जिंकल्या आहेत. तर, चार गमावल्या आहेत. तिन्ही स्वरूपातील एकूण ३० सामन्यांपैकी टीम इंडियाने १८ सामने जिंकले आहेत आणि १० गमावले आहेत. तर, एक सामना बरोबरीत सुटला आहे. तसेच एक कसोटी सामना अनिर्णित ठरला. या ३० सामन्यांमध्ये ११ कसोटी, ११ एकदिवसीय आणि आठ टी-२० सामन्यांचा समावेश होता. यातील ११ कसोटींपैकी टीम इंडियाने फक्त तीन सामने जिंकले आहेत आणि सात सामने गमावले आहेत. तर, एक सामना अनिर्णित ठरला आहे.
न्यूझीलंड आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापन आधीच टीकेच्या भोवऱ्यात सापडले. परिस्थिती कशीही असली तरी आपल्या खेळाच्या नियोजनावर टिकून राहण्याच्या गंभीरच्या दृढ विश्वासामुळे भारतीय क्रिकेट समुदायातील काहींना आश्चर्य वाटले. घरच्या मैदानावर सिंह दमदारी कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध अनपेक्षित पराभव झाला. त्यानंतर टीम इंडियाने १० वर्षांनी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका गमावली.