Join us  

क्रिकेटचे कौतुक पुरे, आशियाई पदक विजेत्यांची पाठ थोपटा; गौतम गंभीरचा स्ट्रेट ड्राईव्ह

भारतात क्रिकेटलाच अधिक महत्त्व मिळत आले आहे आणि त्यामुळे त्याची प्रसिद्धीही अधिक केली जाते. मात्र आता अन्य खेळांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 1:43 PM

Open in App

नवी दिल्ली - भारतात क्रिकेटलाच अधिक महत्त्व मिळत आले आहे आणि त्यामुळे त्याची प्रसिद्धीही अधिक केली जाते. मात्र आता अन्य खेळांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः आशियाई स्पर्धेतील यशानंतर अन्य खेळांनाही समान प्राधान्य द्या. क्रिकेटचे कौतुक पुरे झाले. आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या, असे परखड मत भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले आहे.

जकार्ता येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीयांनी 69 पदकं जिंकली. आशियाई स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी 2010च्या स्पर्धेत भारताने 65 पदकं जिंकली होती. 2018च्या आशियाई स्पर्धेत हिमा दास, स्वप्ना बर्मन, बजरंग पुनिया आणि नीरज चोप्रा यासारख्या अनेक खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करताना तिरंगा डौलाने फडकवला. याच कालावधीत भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर सपाटून मार खात होता. भारताला पाच सामन्यांच्या मालिकेत 1-3 अशी हार मानावी लागली.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला आलेल्या अपयशाने क्रिकेट चाहते दुखावले गेले, तर दुसरीकडे आशियाई स्पर्धेतील अविस्मरणीय कामगिरीने त्यांना आनंदाचे अनेक क्षण दिले. त्यामुळे क्रिकेटपटूंचे कौतुक पुरे करा आणि अन्य खेळांतील खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या, असे गंभीर म्हणाला. त्याने सांगितले की,''आशियाई स्पर्धेतील भारतीय खेळाडूंनी दैदिप्यमान यश मिळवले. स्वप्ना बर्मनची कथा पाहा... खरे नायक हे असे घडतात. या देशात क्रिकेट अधिक प्रसिद्ध असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे, असे मला नेहमी वाटते. पण, अन्य खेळातही खरेखुरे नायक आहेत.'' 

टॅग्स :आशियाई क्रीडा स्पर्धागौतम गंभीरहिमा दासनीरज चोप्रा