Join us

भारताच्या माजी सलामीवीराचा मृत्यू नव्हे, आत्महत्या; का उचललं हे टोकाचं पाऊल?

भारतीय संघाचे माजी सलामीवीर व्ही बी चंद्रशेखर यांच्या निधनाची बातमी गुरुवारी धडकली आणि क्रिकेटवर्तुळात शोककळा पसरली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 12:20 IST

Open in App

चेन्नई : भारतीय संघाचे माजी सलामीवीर व्ही बी चंद्रशेखर यांच्या निधनाची बातमी गुरुवारी धडकली आणि क्रिकेटवर्तुळात शोककळा पसरली. शुक्रवारी चंद्रशेखर यांच्या निधनाला नवे वळण मिळाले आहे. हा नैसर्गिक मृत्यू नसून चंद्रशेखर यांनी आत्महत्या केल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. मैलापोर येथील राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.

तपास अधिकारी सेंथील मुरुगन यांनी सांगितले की,'' 57 वर्षीय चंद्रशेखर यांनी कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली नाही. चंद्रशेखर हे पहिल्या माळ्यावर आपल्या खोलीत होते. त्यावेळी त्यांच्या पत्नीनं अनेकदा दरवाजाची कडी वाजवली, परंतु चंद्रशेखर यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता चंद्रशेखर यांनी सिलिंगला गळफास घेतल्याचे दिसले.''

चंद्रशेखर यांनी सायंकाळी 5.45 वाजता कुटुंबीयांसोबत चहापान केला आणि त्यानंतर ते त्यांच्या खोलीत गेले, अशी माहिती चंद्रशेखर यांची पत्नी सौम्या यांनी पोलिसांना दिली. मुरुगन यानी सांगितले की,''क्रिकेट व्यावसायात तोटा होत असल्यामुळे चंद्रशेखर हे तणावात होते, असे त्यांच्या पत्नीनं आम्हाला सांगितले.'' तामीळनाडू प्रीमिअर लीगमध्ये व्ही बी कांची व्हिरन्स या संघाचे मालकी हक्क चंद्रशेखर यांच्याकडे होते, शिवाय ते व्ही बी नेस्ट या नावानं क्रिकेट अकादमीही चालवत होते. त्यांचे शरीर शवविच्छेदनासाठी येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

क्रिकेट वर्तुळात चंद्रशेखर हे व्ही.बी. या नावाने ओळखले जायचे. तामिळनाडूचे फलंदाज असलेले चंद्रशेखर यांनी भारताकडून सात एकदिवसीय सामने खेळले होते. न्यूझीलंडविरुद्ध विशाखापट्टणम येथे त्यांनी भारताकडून पदार्पण केले होते. चंद्रशेखर तामिळनाडूच्या रणजी संघातील जनदार व्यक्तीमत्व होते. चंद्रशेखर यांनी माजी क्रिकेटपटू के. श्रीकांत यांच्याबरोबर बऱ्याच भागीदाऱ्या रचल्या होत्या. चंद्रशेखर हे भारताच्या निवड समितीचे सदस्य होते. त्याचबरोबर त्यांनी तामिळनाडूच्या संघाचे प्रशिक्षकपदही भूषवले होते. चेन्नईमध्ये त्यांची एक क्रिकेट अकादमीही सुरु आहे.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआय