Join us  

या रे या, सारे या... क्रिकेट वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाला फुटबॉल वर्ल्ड कपचं आमंत्रण

भारताला 1983 व 2011 चा वन डे वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या संघांतील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने ( फिफा) विशेष आमंत्रण पाठवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 11:08 AM

Open in App

मुंबई : भारताला 1983 व 2011 चा वन डे वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या संघांतील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने ( फिफा) विशेष आमंत्रण पाठवले आहे. कतारमध्ये 2022 मध्ये होणाऱ्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेसाठी फिफाने भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या संघांना आमंत्रण पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले. फिफा वर्ल्ड कप 2022 स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नासेर अल खाटेर यांनी भारत हा क्रिकेटप्रेमी देश असल्याचे कबुल केले.

ते म्हणाले,'' 2022 मध्ये कतार येथे होणारा वर्ल्ड कप हा आनंदाचा उत्सव असणार आहे. या उत्सवात भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या संघांचे स्वागत करायला नक्की आवडेल. भारतात क्रिकेट एवढा मोठा खेळ असेल याची मला कल्पना नव्हती. मला इतकेच माहितीय की 1983मध्ये वेस्ट इंडिजला पराभूत करून भारताने वर्ल्ड कप उंचावला होता. तसेच 2011च्या वर्ल्ड कपमध्येही भारताने बाजी मारली होती. या दोन्ही वर्ल्ड कप विजेत्या संघांना आम्ही फुटबॉल वर्ल्ड कप पाहण्यासाठी कतारला येण्याचं आमंत्रण देत आहोत.''

क्रिकेट संघांव्यतिरिक्त या स्पर्धेला भारताच्या फुटबॉलपटूंनाही बोलावण्यात येणार आहे. भारतीय संघाने दोन वर्ल्ड कप उंचावले आहेत. 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर 28 वर्षांनी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेला नमवून बाजी मारली. 

भारतीय संघ तिसऱ्या वर्ल्ड कप जेतेपदासाठी सज्ज होत आहे. या स्पर्धेत भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाळी भारतीय संघाला केवळ एकच वन डे मालिका गमवावी लागली आहे आणि त्यामुळेच भारताला वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. यजमान इंग्लंडकडून भारताला कडवी टक्कर मिळू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

तत्पूर्वी, भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला ट्वेंटी-20 सामन्याने 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दोन सामने अनुक्रमे विशाखापट्टणम व बंगळुरु येथे होतील. पाच सामन्यांची वन डे मालिका 2 मार्चपासून सुरु होईल आणि पहिला सामना हैदराबाद येथे होईल. त्यानंतर नागपूर ( 5 मार्च), रांची ( 8 मार्च), मोहाली ( 10 मार्च ) व दिल्ली ( 13 मार्च ) असे सामने होतील.   

टॅग्स :कपिल देवमहेंद्रसिंह धोनीआयसीसीआयसीसी विश्वकप २०१९