Join us
Daily Top 2Weekly Top 5

लकमलने दिले टीम इंडियाला हादरे, दोन्ही सलामीवीरांसह विराट कोहली माघारी

भारत आणि श्रीलंका यांच्यात आजपासून सुरू झालेल्यी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत श्रीलंकेने नाणेफेक जिंकुन प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. मात्र पावसाने व्यत्यय आणलेल्या पहिल्या दिवसाच्या खेळात यजमान संघाची खराब सुरुवात झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 18:37 IST

Open in App

कोलकाता - भारत आणि श्रीलंका यांच्यात आजपासून सुरू झालेल्यी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत श्रीलंकेने नाणेफेक जिंकुन प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ सुरू होण्यास उशीर झाला असून, सामन्याच्या पहिल्या सत्रातील खेळ वाया गेला आहे.  दरम्यान, भारताच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. लोकेश राहुल आणि शिखर धवन या सलामीवीरांसह कर्णधार विराट कोहलीसुद्धा झटपट माघारी परतल्याने भारताचा डाव अडचणीत आला आहे.  सुरंगा लकमलने पहिल्याच षटकात लोकेश राहुलची विकेट काढत भारताला पहिला धक्का दिला. राहुलला भोपळाही फोडता आला नाही. त्यापाठोपाठ शिखर धवनला 8 धावांवर माघारी धाडत लकमलने श्रीलंकन संघाला दुसरे यश मिळवून दिले. कर्णधार विराट कोहलीनेसुद्धा निराशा केली. तो वैयक्तिक शून्य धावसंख्येवर लकमलची तिसरी शिकार झाला. 

पावसामुळे पहिल्या दिवसाचा  खेळ लवकर थांबवावा लागला तेव्हा भारताच्या 3 बाद 17 धावा झाल्या होत्या. चेतेश्वर पुजारा 8 धावांवर खेळत होता. तर अजिंक्य रहाणेने अद्याप खाते उघडलेले नव्हते. श्रीलंकेकडून लकमलने भन्नाट स्पेल टाकताना सहापैकी सहा षटके निर्धाव टाकत तीन बळी टिपले.  

तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी लय कायम राखण्याच्या इराद्यानेच ‘कोहली अ‍ॅन्ड कंपनी’ मैदानात उतरणार आहे. श्रीलंका संघापुढे पराभवाची शृंखला मोडीत काढण्याचे आव्हान असेल. लंका दौ-यात भारताने क्रिकेटच्या सर्व प्रकारांत विजय नोंदवित ९-० असे ‘क्लीन स्वीप’ केले. नंतर लंकेने यूएईत पाकवर २-० ने विजय नोंदवित पराभवाची जखम भरून काढली होती. भारतीय संघ यानंतर दोन महिन्यांचा द. आफ्रिका दौरा करणार असल्याने या दौºयाकडे गांभीर्याने पाहत आहे. जुलै- ऑगस्टमधील कसोटी मालिकेनंतर भारताने १३ वन-डे आणि सहा टी-२० सामने खेळले. तरीही खेळाडूंना कसोटीसाठी सज्ज होण्यास त्रास होणार नाही. संघातील अनेक जण आपापल्या राज्याकडून रणजी सामन्यात खेळले आहेत.पावसाचा जोर कायमहवामान खात्याने १८ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तविली आहे. आज पहिल्या सत्रातील खेळही पावसामुळे वाया गेला आहे.  ईडनच्या हिरव्यागार खेळपट्टीवर भुवनेश्वरचे खेळणे निश्चित मानले जाते. संघात ३ वेगवान आणि २ फिरकी गोलंदाज असतील. भुवीने २०१६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत पाच गडी बाद केले होते. त्याच्या सोबतीला उमेश यादव आणि महंमद शमी असतील. फलंदाजीत मुरली विजयचे पुनरागमन होऊ शकते. चेतेश्वर पुजारा मधल्या फळीचा आधार असेल. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत आश्विन दोन्ही आघाड्यांवर सरस ठरू शकतो.मॅथ्यूज चौथ्या स्थानावर खेळणारज्येष्ठ फलंदाज अँजेलो मॅथ्यूज चौथ्या स्थानावर फलंदाजीला येणार, अशी माहिती लंकेचा कर्णधार दिनेश चंडीमलने दिली. मॅथ्यूजच्या अनुभवाचा आम्हाला लाभ होईल, अशी आशा वर्तवित चंडीमल म्हणाला, ‘भारताविरुद्ध कोलंबोत शतक झळकविणारा मॅथ्यूज आॅगस्ट २०१५ पासून कसोटीत शतक झळकवू शकला नाही. तो भारताविरुद्ध गोलंदाज नव्हे तर फलंदाज म्हणून खेळणार आहे.’लंकेच्या विजयाचा दुष्काळ१९८२ पासून लंकेने भारतात ३५ वर्षांत १६ कसोटी सामने खेळले, पण यापैकी एकही जिंकला नाही. अनुभवहीन कर्णधार दिनेश चंडीमलच्या नेतृत्वात हा संघ विजयाची आशा बाळगून आहे. त्यासाठी अँजेलो मॅथ्यूज आणि रंगाना हेराथ या गोलंदाजांना अप्रतिम कामगिरी करावी लागेल. मॅथ्यूजकडून धावांचीदेखील संघाला अपेक्षा आहे.

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघश्रीलंकाक्रीडा