लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानात पाचव्या आणि अखेरच्या दिवसापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय संघावर पराभवाची नामुष्की ओढावली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं पहिल्या कसोटी सामन्यात ५ शतकांसह ऐतिहासिक कामगिरी करुन दाखवत दिमाखदार खेळ दाखवला. पण शेवटी यजमान इंग्लंडचा संघ टीम इंडियावर भारी पडला. भारतीय संघाने दिलेल्या ३७१ धावांचा यशस्वी पाठलाग करत इंग्लंडच्या संघाने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. फलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर क्षेत्रक्षणात झालेल्या चुकांमुळे गोलंदाजांची ताकद कमी केली अन् टीम इंडियावर पराभवाची वेळ आली. इंग्लंडच्या संघाने या सामन्यात दुसऱ्या सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत नवा विक्रमही प्रस्थापित केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्या डावात भारतीय संघाने घेतली होती अल्प आघाडी
हेडिंग्ले कसोटी सामन्यात नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने यशस्वी जैस्वाल १०१ (१५९), शुबमन गिल १४७ (२२७) आणि रिषभ पंत १३४ (१७८) या तिघांच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ४७१ धावा केल्या होत्या. त्यानंतर जसप्रीत बुमराहने घेतलेल्या ५ विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या डावात ४६५ धावांवर रोखत ६ धावांची अल्प आघाडी घेतली होती. इंग्लंडकडून पहिल्या डावात ओली पोप १०६ (१३७), बेन डकेट ६२ (९४) आणि हॅरी ब्रूक ९९ (११२) यांनी दमदार कामगिरी केली.
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
दुसऱ्या डावात टीम इंडियाकडून दोन शतके, पण त्यावर एक शतक आणि दोन अर्धशतके पडली भारी
दुसऱ्या डावात केएल राहुल १३७ (२४७) आणि रिषभ पंत ११८ (१४०) यांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर ३६४ धावा करत भारतीय संघाने इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना बेन डकेट १४९ (१७०) आणि झॅक क्रॉउली ६५(१२६) यांनी इंग्लडच्या संघाला मजबूत सुरुवात करून दिली. ही दोघे माघारी फिरल्यावर ओली पोप ८(८) हॅरी ब्रूक ० (१) आणि बेन स्टोक्स ३३(५१) यांची विकेट पडल्यावर भारतीय संघ कमबॅक करेल, असे वाटत होते. पण जो रूटनं ८४ चेंडूत केलेल्या नाबाद ५३ धावांची खेळी आणि जेम स्मिथन ५५ चेंडूत नाबाद ४४ धावा करत पाच विकेट्स राखून भारतीय संघाने दिलेल्या धावा सहज पार केल्या.