India vs England Test Series Karun Nair : भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅम येथील एजबेस्टनच्या मैदानात सुरु आहे. तीन बदलासह मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने या सामन्यात आठ वर्षांनी कमबॅक करणाऱ्या करूण नायरला बढती दिली. लोकेश राहुल स्वस्तात माघारी फिरल्यावर त्याच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्ष होती. पण संधीचं सोनं करायला तो पुन्हा चुकला. दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात चांगली सुरुवात केल्यावर तो ३१ धावांवर तंबूत परतला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सलग तिसऱ्या डावात ठरला अपयशी
देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्यावर "गिव्ह मी वन मोअर चान्स..." अशी साद घालणाऱ्या करुण नायरवर बीसीसीआयने मोठा डाव खेळला आहे. पण पहिल्या दोन डावातील अपयशानंतर तिसऱ्या डावातील अपयशामुळे या फलंदाजाला आणखी किती संधी द्यायची असा प्रश्न पडू शकतो. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्याआधी करूण नायर याने भारत 'अ' संघाकडून द्विशतकी खेळीसह संधीचं सोनं करण्याची धमक असल्याचे संकेत दिले होते. पण आता सराव तगडा अन् मुख्य परीक्षेत तिसऱ्या प्रयत्नातही नापास अशी काहीशी वेळ त्याच्यावर आलीये.
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
आठ वर्षांनी संधी मिळाली त्यात आता बढती, मात्र तो पुन्हा ठरला बिनकामाचा
सेहवागनंतर कसोटीत त्रिशतकी खेळी करणारा दुसरा भारतीय बॅटर असलेल्या करुण नायरनं लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानातून ८ वर्षांनी कमबॅकचा सामना खेळला. या सामन्यातील पहिल्याच डावात त्याच्या पदरी भोपळा पडला होता. दुसऱ्या डावातही तो २० धावा करून तंबूत परल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या कसोटी सामन्यात संघात तीन मोठे बदल करण्यात आले. पण करुण नायरवर विश्वास कायम ठेवण्यात आला. साई सुदर्शन प्लेइंग इलेव्हनमधून आउट झाल्यामुळे पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या करूण नायरला तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली. पण चांगल्या सुरुवातीनंतर ५ चौकाराच्या मदतीने ३१ धावा करून तो तंबूत परतला. इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या ३ डावात त्याच्या खात्यात फक्त ५१ धावा आहेत. ही आकडेवारी टीम इंडियासह करुण नायरचे टेन्शन वाढवणारी आहे.
२०१६ मध्ये इंग्लंड विरुद्ध त्रिशतक, मग...
करुण नायर याने २०१६ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात ३०३ धावांची खेळी केली होती. चेन्नईच्या मैदानातील या कामगिरीनंतर तो संघातून गायब झाला. त्याला फारशी संधीच मिळाली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीतील धमक दाखवल्यावर त्याला पुन्हा एकदा टीम इंडियाकडून संधी मिळाली आहे. त्याच्याकडून संघाला आश्वासक अन् मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. पण तिसऱ्या डावातही त्याने निराश केले.