ENG vs IND 1st Test : लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडच्या संघाने पिछाडीवरून दमदार कमबॅक करत टीम इंडियाला पराभूत करून दाखवले. या सामन्यातील विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडच्या संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाने नाणेफेक गमावल्यावर नेटानं बॅटिंग करत पहिल्या दिवसापासून सामन्यात छाप सोडली. पण मोक्याच्या क्षणी झालेल्या चुका टीम इंडियाला महागात पडल्या. इथं जाणून घेऊयात दिमाखदार फलंदाजीनंतर भारतीय संघ नेमकं कुठं कमी पडला अन् काय आहेत टीम इंडियाच्या पराभवामागची पाच प्रमुख कारण त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्या डावात तीन शतके आली, पण....
पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाकडून पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल, कर्णधार शुबमन गिल आणि उप-कर्णधार रिषभ पंत यांच्या भात्यातून शतकी खेळी पाहायला मिळाली. पहिल्या डावात ४३० धावांवर भारतीय संघाने शुबमन गिलच्या रुपात तिसरी विकेट गमावली होती. या डावात भारतीय संघ ५५० पेक्षा अधिक धावा अगदी सहज करेल, असे वाटत होते. पण ४१ धावांत भारतीय संघाने शुबमन गिलच्या विकेट्ससह ७ विकेट्स गमावल्या. इथं इंग्लंडच्या संघाला कमबॅकची संधी मिळाली.
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
क्षेत्ररक्षणातील चुका, कॅच सुटले अन् मोठ्या आघाडीची संधी हुकली
इंग्लंडच्या पहिल्या डावात पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराहने सलामी जोडी फोडली. भारताच्या सलामी जोडीनं पहिल्या डावात ९१ धावा केल्या. याउलट इंग्लंडच्या संघाने ४ धावांवर आपली पहिली विकेट गमावली. पण त्यानंतर बेन डकेट अन् ओली पोप या जोडीनं शतकी भागीदारीसह डाव सावरला. बेन डकेटनं कॅच सुटल्याचा फायदा घेत अर्धशतक झळकावले. दुसरीकडे ओली पोपनं ६० धावांवर झेल सुटल्यावर शतक ठोकले. एवढेच नाही तर हॅरी ब्रूकचाही कॅच सुटला अन् त्याने ९९ धावांची खेळी केली. इंग्लंडचा संघ भारतीय संघाने उभारलेल्या धावसंख्ये पर्यंत पोहचू शकला नाही. पण टीम इंडियाची मोठी आघाडी मिळवण्याची संधी हुकली.
दुसऱ्या डावात फलंदाजीत पुन्हा तेच घडलं
भारतीय संघाने अल्प आघाडी घेतल्यावर दुसऱ्या डावात लोकेश राहुल आणि रिषभ पंत यांच्या शतकाच्या जोरावर पुन्हा मोठी धावसंघ्या उभारली. पण प्लॅटफॉर्म सेट असताना पुन्हा एकदा तळाच्या फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी नांगी टाकली. परिणामी इंग्लंडसमोर ४०० पेक्षा अधिक धावांचे टार्गेट सेट करण्यात टीम इंडिया मागे पडली. जड्डू सोडला तर अन्य कुणालाही आश्वासक खेळी करता आली नाही. खासकरून शार्दुल ठाकूरकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. पण तो फलंदाजीत धमक दाखवू शकला नाही.
सलामी जोडीला रोखण्यात आलेले अपयश
भारतीय संघाने ३७१ धावांचे टार्गेट सेट केल्यावर इंग्लंडच्या सलामी जोडीनं तोऱ्यात बॅटिंग केली. जसप्रीत बुमराहसमोरही ही जोडी उजवी ठरली. दोघांनी १८८ धावांची केलेली भागीदारीमुळे टीम इंडियाला बॅकफूटवर नेले. जसप्रीत बुमराहला दुसऱ्या डावात एकही विकेट मिळाली नाही. मोहम्मद सिराजनं प्रभावी मारा केला, पण तो विकेट लेस राहिला. या गोष्टी टीम इंडियाच्या अडचणीत भर टाकणाऱ्या ठरल्या.
पुन्हा कॅच सुटला तिथं मॅच फिरली
पहिल्या डावात इंग्लंडच्या ताफ्यातील तिघांना जीवनदान मिळाले. त्यांनी या संधीच सोनं करून दाखवत भारतीय संघाला मोठी आघाडी घेण्यापासून रोखलं. दुसऱ्या डावात बेन डकेटला पुन्हा जीवनदान मिळाले. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर ९७ धावांवर यशस्वी जैस्वालनं बेन डकेटचा कॅच सोडला. त्यानंतर त्याने १४९ धावांची खेळी केली त्याची ही खेळी मॅच इंग्लंडच्या बाजूनं सेट करणारी ठरली.
Web Title: ENG vs IND 1st Test Five Reasons why Team India fell to Defeat at Headingley Against England
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.