India vs England 2nd Test Day 4 : भारत-इंग्लंड यांच्यातील अँडसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील पहिला सामना गमावल्यावर मालिकेत कमबॅकसाठी टीम इंडियानं बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टनच्या मैदानात यजमान इंग्लंड संघासमोर धावांचा डोंगर उभारला आहे. शुबमन गिलच्या शतकाशिवाय केएल राहुल, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने दुसरा डाव ६ बाद ४२७ धावांवर घोषित केला. पहिल्या डावातील १८० धावांच्या आघाडीसह टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांसमोर ६०८ धावांचे टार्गेट सेट केलं आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
केएल राहुलचं अर्धशतक
दुसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. करुण नायर २६ धावांवर तंबूत परतला. पण त्यानंतर लोकेश राहुलनं ८४ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. कर्णधार शुबमन गिल याने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीतील धमक दाखवून देताना शतकी खेळीसह अनेक विक्रम प्रस्थापित केले.
शुबमन गिलचा धमाका अन् रिषभ पंतसोबत तगडी भागीदारी
दुसऱ्या बाजूला रिषभ पंतची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी रचली. रिषभ पंत ५८ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ६५ धावा करून बाद झाला. मग रवींद्र जडेजाच्या भात्यातून आणखी एक अर्धशतक आले. त्याने ११८ चेंडूत नाबाद ६९ धावांची खेळी केली. भारतीय संघाने दुसऱ्या डावात ८३ षटकात ४२७ धावा करत इंग्लंडसमोर ६०८ धावांचे टार्गेट सेट केले. आतापर्यंत कोणत्याही संघाने एवढे टार्गेट पार केलेले नाही. हा सामना जिंकण्यापेक्षा पराभव टाळण्याचं मोठं आव्हान इंग्लंडसमोर आहे. पहिल्या डावात गोलंदाजीत जी धमक दिसली ती पुन्हा दाखवून देत टीम इंडियाला मालिकेत कमबॅकची चांगली संधी आहे.