राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार संजू सॅमसन आयपीएलच्या यंदाच्या हंगामात संजू सॅमसन पिवळ्या जर्सीत दिसणार आहेत. मात्र, संजू सॅमसनच्या जाण्यामुळे राजस्थानच्या संघाचे मोठे नुकसान झाले असून संघातील इतर खेळाडूंवर दबाव येण्याची शक्यता आहे, असे मत दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू फॅफ डु प्लेसिस याने व्यक्त केले.
जिओ हॉटस्टारशी संवाद साधताना फॅफ म्हणाला की, "ज्याप्रमाणे मुंबई इंडियन्स म्हणजे रोहित शर्मा, सीएकएस म्हणजे धोनी आणि आरसीबी म्हणजे विराट कोहली, तसेच राजस्थान रॉयल्स म्हणजे संजू सॅमसन असे समीकरण बनले होते. संजू हा केवळ खेळाडू नव्हता, तर तो या फ्रँचायझीचा चेहरा होता. नवीन पिढीचा खेळाडू असूनही त्याने आपली ही ओळख निर्माण केली होती. आता तो गेल्यामुळे चाहत्यांना संघाशी जोडून ठेवणे राजस्थानसाठी मोठे आव्हान असेल."
संजूच्या जाण्याचा सर्वाधिक फटका सलामीवीर यशस्वी जैस्वालला बसेल, असेही फॅफने नमूद केले. फॅफच्या मते, "संजू मैदानावर असताना यशस्वी अतिशय निर्भयपणे आणि नैसर्गिक खेळ खेळायचा. त्याला माहित होते की, मागे संजू आहे. मात्र, आता यशस्वीला अधिक जबाबदारीने खेळावे लागेल, जे त्याच्यासाठी सोपे नसेल."
संजू सॅमसनच्या एक्झिटनंतर राजस्थान रॉयल्सने युवा अष्टपैलू खेळाडू रियान पराग याची नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती केली. रियानसाठी हे एक मोठे आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे, राजस्थान रॉयल्सचा या हंगामातील पहिलाच सामना ३० मार्च रोजी गुवाहाटी येथे चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होणार आहे.