Cricketers appaluds Operation Sindoor: काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने मध्यरात्री घेतला. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने एअरस्ट्राईक केला. या हल्ल्यात पाकिस्तानच्या भूमीत राहून भारतात रक्तपात घडवणाऱ्या मसूद अजहरवर अखेर भारताने वार केला. पाकिस्तानमधील बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर भारतीय लष्कराने जोरदार हवाई हल्ला केला. यात जैशचे मुख्यालय असलेले मरकज सुभानल्लाह पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. हल्ल्यानंतर जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयाचे व्हिडीओ समोर आले आहेत. मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. या हल्ल्याला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आले. तिन्ही सैन्यदलाने मिळून ही संयुक्त कारवाई केली. भारताच्या धाडसी सैन्याने पाकिस्तानच्या ४ आणि पीओकेमध्ये ५ ठिकाणी एकाचवेळी टार्गेट केले. क्रिकेट जगतातील अनेकांनी भारतीय सैन्यदलाचे तोंडभरून कौतुक केले.
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणाला, "एकात्मतेत निर्भयता आहे आणि अमर्याद शक्ती आहे. भारताची जनता हिच भारतमातेची ढाल आहे. या जगात दहशतवादाला थारा नाही. आपण एक संघ आहोत. जय हिंद"
धडाकेबाज माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग म्हणाला, जर तुमच्यावर कोणी दगडफेक केली तर त्याच्यावर फूल फेका. पण लक्षात ठेवा की फुलासोबत कुंडीही फेकून मारली पाहिजे. जय हिंद. ऑपरेशन सिंदूर हे अतिशय चपखल नाव आहे.
दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग म्हणाला, जय हिंद! ऑपरेशन सिंदूर हा भारताने पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या निष्पाप बांधवांचा घेतलेला बदला आहे.
माजी सलामीवीर शिखर धवन म्हणाला, भारत दहशतवादाविरोधात भूमिका घेऊ शकतो हे आज दिसून आलं. भारत माता की जय!
प्रसिद्ध हिंदी समालोचक म्हणाला, आपण सारे एक आहोत आणि भक्कम आहोत.
भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाला, जय हिंद ऑपरेशन सिंदूर.