भारत-न्यूझीलंड यांच्यात 18 जूनपासून आससीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदाचा ( ICC World Test Championship final ) सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. भारतीय संघ 20 सदस्यांसह लंडनमध्ये दाखल झाला असून खेळाडूंची दोन गटांत विभागणी करून WTC Finalसाठी सराव करत आहे. दुसरीकडे न्यूझीलंडनं WTC Final च्या तयारीसाठी इंग्लंडविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली अन् त्यात 1-0 असा विजयही मिळवला. महान फलंदाज सचिन तेंडुलकर यानं न्यूझीलंडच्या या रडीच्या डावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला अन् केन विलियम्सनच्या संघावर हल्लाबोल केला. ( Sachin Tendulkar questions timing of ENG vs NZ Test series)
जागतिक कसोटी फायनलपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेचा न्यूझीलंडला फायदा मिळेल, असे मत तेंडुलकरनं टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना व्यक्त केलं. पण, त्याचवेळी विराट कोहली अँड टीम आधीच्या अनुभवातून किवींनी कडवी टक्कर देईल, असेही तो म्हणाला. ''यात काहीच शंका नाही. न्यूझीलंडचे पारडे सध्या जड झालेले आहे, कारण त्यांनी इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले आहेत. दुसरीकडे भारताला सराव सामना खेळायलाच मिळालेला नाही, त्यांना आपापसातच सराव करावा लागत आहे,''असे तेंडुलकर म्हणाला.
WTC Final 2021 : न्यूझीलंडनं मैदानावर उतरवली तगड्या खेळाडूंची फौज, इंग्लंडची धुलाई करणारा फलंदाज टीम इंडियाची वाढवणार चिंता
तो पुढे म्हणाला,''एक चांगली गोष्ट अशी की, आपल्या खेळाडूंमध्ये कोठेही खेळण्याची क्षमता आहे. त्यांनी इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळलेली आहे आणि भारत अ संघाकडूनही अनेक खेळाडू येथे खेळले आहेत. त्यामुळे येथील परिस्थिती ही त्यांच्यासाठी नवी नाही.''
इंग्लंड-न्यूझीलंड मालिका WTC Final नंतर घ्यायला हवी होती
तेंडुलकर म्हणाला,'' न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड या मालिकेचे नियोजन आधीच झाले होते का, याबाबत कल्पना नाही. न्यूझीलंडनं अंतिम सामन्यातील त्यांचे स्थान पक्कं करण्यापूर्वी, ही मालिका ठरवली असावी, असं मला वाटतं. हा निव्वळ योगायोगही असावा. पण, ही मालिका WTC Final साठी हातभार लावणारी नाही, त्यामुळे ही मालिका WTC Final नंतरही खेळवली गेली असती.''
WTC Final ही मालिका स्वरूपात खेळवावी
भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अन्य दिग्गजांच्या मताप्रमाणेच WTC Final चा निकाल हा एका सामन्यावरून लावण्यापेक्षा मालिकाच खेळवण्यात यावी, असे मत तेंडुलकरने व्यक्त केले. ''कसोटी क्रिकेटची फायनल खेळवताना 2 किंवा 3 सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करायला हवं. एका सामन्यावर तुम्ही विजेता कसं ठरवू शकता, यात सातत्य कुठेय?, ही खरं तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप सीरिज असायला हवी होती.''