- अयाझ मेमम
कन्सल्टिंग एडिटर, लोकमत
चेन्नई सुपरकिंग्जचे दोन खेळाडू पॉझिटिव्ह येताच स्टार खेळाडू सुरेश रैना याने वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला.यामुळे कोरोना संकटात अडकलेला सीएसके रैनामुळे दुहेरी पेचात पडला. सीएसके पथकातील काही जण पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त शुक्रवारी आले. बीसीसीआयने मात्र खेळाडूंची नावे आणि संख्या जाहीर केली नव्हती. शनिवारी मात्र अधिकृत वक्तव्य करीत बीसीसीआयने दोन खेळाडूंसह १३ जण पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर केले. नावे मात्र गुप्त ठेवण्यात आली आहेत.
सीएसकेने उत्तरांपेक्षा प्रश्नांचा घोळ निर्माण केल्यामुळे रैनाने या अज्ञात कारणांमुळे घरी परतण्याचा निर्णय घेतला असावा. जूनमध्ये क्रिकेट सुरू झाले. खेळाडूंना कुठलेही भय न बाळगता मालिका आणि स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. तरीही शिमरोन हेटमायर, डेरेन ब्राव्हो आणि केमो पॉल यांनी वैयक्तिक सुरक्षेपोटी इंग्लंड दौऱ्यातून माघार घेतली होती. कोरोनाची भीती चुकीची नाही. क्रिकेटला प्राधान्य देत खेळाडू स्वत:ला आणि कुटुंबाला संकटात ढकलू शकणार नाहीत.तरबेज खेळाडू फिटनेसच्या बळावर संकट टाळू शकले, मात्र अनेकांच्या फिटनेसचा स्तर देखील घसरलेला पहायला मिळाला.
टेनिसमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जोकोविचला देखील कोरोनाने ग्रासले होते. यूएईत बायो बबल्समध्ये वास्तव्यानंतरही खेळाडू पॉझिटिव्ह कसे आले हा मूळ मुद्दा आहे. भारतात झालेल्या चाचण्या आणि यूएईतील चाचण्या अनियमित होत्या का? हे शक्य नाही. मोहम्मद हफीजबाबत असाच प्रकार घडला होता.चाचणी पॉझिटिव्ह येण्यामागे हे लोक अन्य कुठल्यातरी प्रकारे कोरोना वाहकाच्या संपर्कात आले असावेत.यामुळे बायो बबल्सवर प्रश्नचिन्ह लागते. हे एसओपीचे उल्लंघन असेल का. असे असेल तर मुद्दा गंभीर ठरतो.कारण काहीही असो, बीसीसीआयची चिंता वाढली आहे. यापुढे एसओपीचा अधिक कठोर अंमल होईल.समस्येवर तोडगा निघणार नसेल तर आयपीएलचे आयोजन धोक्यात येईल. पुढे भारताच्या आॅस्ट्रेलिया दौºयावर देखील प्रश्न उपस्थित होण्याची भीती आहे.
साधारण स्थितीत बीसीसीआयने हा अहवाल जाहीर नसता केला तरी चालले असते. मात्र सध्या गोपनीयता बाळगली जात असल्याने अनेक शंकांना वाव मिळतो. दुसरीकडे मात्र सर्व १३ जणांना विलगीकरणात पाठविल्याचे आणि त्यांच्यावर वैद्यकीय पथकाची नजर असल्याचे जाहीर करुन एसओपीचे पालन करीत असल्याचे बीसीसीआयने दाखवून दिले. जे उपाय करण्यात आले ते आश्वस्त करणारे असले तरी बाधितांची नावे दडविण्याचा प्रकार वादाला जन्म देणारा ठरतो. स्पर्धेत सहभागी लोकांसाठी हा भाग अन्यायकारक ठरतो. रैनाला कुठल्या कारणांसाठी परतणे भाग पडले हे स्पष्ट झालेले नाही.अन्य कारण कुठलेही असे, मात्र कोरोना चिंता हे देखील प्रमुख कारण आहेच.