Join us
Daily Top 2Weekly Top 5

अव्वल स्थान टिकविण्याचे भारतापुढे आव्हान

लॉर्ड्स मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. हा सामना केवळ मोठ्या अंतराने गमावला नाही, तर फक्त अडीच दिवसांत ही लढत संपली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 04:36 IST

Open in App

- अयाझ मेमनसंपादकीय सल्लागारलॉर्ड्स  मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. हा सामना केवळ मोठ्या अंतराने गमावला नाही, तर फक्त अडीच दिवसांत ही लढत संपली. पहिला दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतरही भारताला सामना वाचवता आला नाही. दोन्ही डावांत मिळून भारताला एकूण ८२ षटके फलंदाजी करता आली. एकूणच हा अत्यंत निराशाजनक पराभव ठरला.भारताची फलंदाजी अत्यंत कमजोर झाली आहे. शिवाय फलंदाजी केवळ ‘वन मॅन शो’ विराट कोहलीवर अवलंबून आहे. तो जेव्हा खेळतो तेव्हा धावा बनतात, पण जेव्हा कोहली अपयशी ठरतो तेव्हा भारताच्या धावाच उभारल्या जात नाहीत. या सामन्याच्या दोन्ही डावांत कोहली अपयशी ठरला. सामन्यात भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या त्या रविचंद्रन अश्विन याने. दोन्ही डावांत त्याने संयमी फलंदाजी केली. जर सहाव्या, सातव्या किंवा आठव्या क्रमांकाचा फलंदाज सर्वाधिक धावा फटकावणारा ठरत असेल, तर संघाची आघाडीची फळी किती अपयशी ठरली याचा अंदाज येतो. मुरली विजय दोन्ही डावांत शून्यावर परतला. दिनेश कार्तिकही काहीच छाप पाडू शकला नाही. ज्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या त्या अजिंक्य रहाणेलाही अपेक्षित कामगिरी करता आली नाही. गेल्या दौºयात लॉडर््सवर त्याने शतक झळकावले होते, त्यामुळे रहाणेकडून अपेक्षा होती.एजबस्टन कसोटी सामना भारताने ३१ धावांनी गमावला होता. त्यामुळे लॉडर््सवर भारताकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र तसे काहीच झाले नाही. जर एक संघ पहिल्या डावात १०७ धावा काढत असेल, तर त्यांचा पराभव हा निश्चितच होणार. तरी एकवेळ इंग्लंडचे १३० धावांवर ५ बळी गेले होते आणि या वेळी भारताने इंग्लंडची आघाडी मर्यादित ठेवली, तर पुनरागमनाची संधी असल्याचे दिसत होते. पण ख्रिस वोक्सने शतक ठोकत चित्र पालटले. तसेच सॅक कुरनने शानदार खेळी केली. शिवाय, भारताला फलंदाजीसाठी अत्यंत कठीण परिस्थिती मिळाली. पण हेच कसोटी सामन्यातील आव्हान असते. अशा परिस्थितीमध्ये केवळ गुणवत्ता असून चालत नाही, तर क्षमता आणि संयम असणेही गरजेचे असते. दुसºया डावात तुलनेत सोपी परिस्थिती होती, मात्र तरीही फलंदाजी ढेपाळली. त्यामुळे एकूणच भारताची निराशाजनक कामगिरी राहिली आहे.त्यात आता भर पडली आहे, ती विराट कोहलीच्या पाठीच्या दुखण्याची. त्यामुळे त्याच्या तिसºया सामन्यातील समावेशावर प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच अश्विनच्या बोटालाही दुखापत झाल्याने भारताच्या अडचणीत भर पडली. अशावेळी भारत काय करणार, हाच प्रश्न आहे. सर्व खेळाडूंची कामगिरी पाहता प्रशिक्षक रवी शास्त्री, कोहली यांना गंभीर विचार करावा लागेल. यासह काही कठोर निर्णयही त्यांना घ्यावे लागतील. माझ्या मते करुण नायर, रिषभ पंतसारख्या युवा खेळाडूंना संधी मिळावी. कारण ते गेल्या दोन महिन्यांपासून येथे ‘अ’ संघातून खेळत आहेत. त्यामुळे नक्कीच त्यांना संधी मिळायला हवी. शिवाय दुसºया सामन्यात दोन फिरकी गोलंदाजांना खेळविण्याचा चुकीचा निर्णयही घेण्यात आला. एक कर्णधार म्हणून कोहलीवरही मोठी जबाबदारी आली आहे. उपलब्ध पर्यायांतून योग्य खेळाडू निवडण्याचे आव्हान त्याच्यापुढे आहे. एकूणच आता भारतापुढे आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थान टिकविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेट