राजस्थान : कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) निलंबित केले. त्यानंतर हार्दिककडे ब्रँड्सनेही पाठ फिरवली आणि खार जिमखानाने त्याचे मानद सदस्यत्व रद्द केले. या प्रकरणावरील सुनावणी न्यायालयात प्रलंबित आहे आणि 19 फेब्रुवारीला त्यावर निकाल अपेक्षित आहे. तोपर्यंत या दोघांवरील बंदी हटवण्यात आली आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या भारतीय संघाकडून न्यूझीलंड दौऱ्यात खेळत आहे, तर राहुल भारत A संघाकडून स्थानिक सामना खेळला. पण, कॉफी विथ करणचं भूत त्यांच्या मानगुटीवर कायम आहे. जोधपूरमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
या दोघांबरोबर कार्यक्रमातील सुत्रसंचालक करण जोहरवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोधपूरमधील सरेचा गावातील देवाराम मेघवाल यांनी लूनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात पांड्या असं नक्की बोलला तरी काय?
करण जोहर : नाईट क्लबमध्ये तु मुलींना त्यांची नावं का नाही विचारत?
हार्दिक पांड्याः मला प्रत्येकीची नावं लक्षात राहत नाही. क्लबमध्ये मुली कशा चालतात हे मला पाहणे आणि निरिक्षण करायला आवडते. त्या कशा चालतात हे पाहण्यासाठी मी त्यांच्या मागेच उभा राहतो. मी जेव्हा पहिल्यांदा सेक्स केले. तेव्हा मी घरी येऊन म्हणालो की, मै करके आया आज ( आज मी करून आलो).''
कुटुंबीयही किती कूल आहेत हे पांड्या सांगू लागला. तो म्हणाला,''एका पार्टीमध्ये आई-वडिलांनी मला विचारले, अच्छा तेरा वाला कौन सा है ( यातील तुझी गर्लफ्रेंड कोण?). त्यावेळी मी ही, ही, ही ( अनेक मुलींकडे बोट दाखवत) असे म्हणालो आणि त्यावर त्यांनी माझा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया दिली. ''
करण जोहर : तुम्ही दोघं एकाच मुलीच्या मागे लागलात, तर त्याचा निर्णय कसा घ्याल?
लोकेश राहुल : हा निर्णय त्या मुलीवर सोडू
हार्दिक पांड्या : असं काही नसत, सर्व काही टॅलेंटवर अवलंबून आहे. ज्याला मिळेल त्यानं घेऊन जावं.