Family Emergency in Team India, IND vs ZIM T20 World Cup 2026: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज आणि मॅच फिनिशर रिंकू सिंग (Rinku Singh) याला अनपेक्षितपणे घरी परतावे लागले आहे. तो चेन्नईहून घरी परतला आहे. रिंकू सिंगच्या परतीचे कारण कुटुंबातील आपत्कालीन परिस्थिती (Health Emergency) असल्याचे सांगितले जात आहे. अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सुपर ८ सामना गमावल्यानंतर, टीम इंडिया त्यांच्या पुढील सामन्यासाठी चेन्नईला पोहोचली होती. चेन्नईला पोहोचल्यानंतर रिंकू सिंगला ही बातमी मिळाली. त्यामुळे तो भारतीय संघाचा कॅम्प सोडून घरी परतला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा
रिंकू सिंगच्या घरात नेमकं काय घडलंय?
मिळालेल्या वृत्तानुसार, २०२६ च्या टी२० विश्वचषकादरम्यान रिंकू सिंग अचानक घरी परतण्यामागील कारण त्याच्या वडिलांशी संबंधित असल्याचे वृत्त आहे. रिंकू सिंगच्या वडिलांची प्रकृती बिघडली असून ते गंभीर आहेत. त्यांना ग्रेटर नोएडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डावखुरा फलंदाज रिंकू सिंग मंगळवारी सकाळी चेन्नईहून घरी परतण्यासाठी निघाला, कारण त्याच्या वडिलांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
झिम्बाब्वे विरुद्धचा सामना खेळण्याबाबत साशंकता
वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे अचानक घरी परतलेला रिंकू सिंग मंगळवारी टीम इंडियाच्या सराव सत्रात अनुपस्थित होता. २६ फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची त्याची शक्यताही कमी आहे.
२०२६ च्या टी२० विश्वचषकात रिंकू सिंगची कामगिरी कशी आहे?
२०२६ च्या टी२० विश्वचषकात रिंकू सिंगची फलंदाजीची कामगिरी विशेष प्रभावी नव्हती. क्षेत्ररक्षणात त्याने प्रभाव पाडला असला तरी, पाच सामन्यांमध्ये त्याने पाच डावांमध्ये फक्त २४ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये नाबाद ११ हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे. चेंडूच्या बाबतीत, त्याने फक्त एक षटक टाकले आहे, ज्यामध्ये ९ धावा दिल्या आहेत.