टी-२० सामन्यात एका गोलंदाजाला ५ विकेट काढताना हवा निघते. जसप्रीत बुमराह भलेही जगातील सर्वात खतरनाक गोलंदाजांपैकी एक असेल परंतु त्यानेही टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात आतापर्यंत ५ विकेट्स घेतल्या नाहीत. मात्र एका गोलंदाजाने ५ नाही तर तब्बल ९ विकेट्स घेऊन क्रिकेट जगतात खळबळ माजवली आहे. या गोलंदाजाने असा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे जो आतापर्यंत कुणी बनवला नाही. या गोलंदाजाची कामगिरी इतकी खतरनाक होती ज्याने एकाच षटकांत हॅटट्रिक घेतली शिवाय ६ चेंडूत ४ विकेट मिळवल्या.
ब्राझीलची लॉरा कार्डोसो हिने पुरुष किंवा महिला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात नऊ बळी घेणारी पहिली खेळाडू बनून विक्रमांच्या यादीत आपले नाव कोरले आहे. कार्डोसोने लेसोथोविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी केली. केवळ तीन षटकांत चार धावा देत तिने विरोधी टीममधील ९ खेळाडूंना मैदानाबाहेर पाठवले. जी टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. कार्डोसोने तिच्या तीनपैकी दोन षटकांत एकही धाव दिली नाही. यापूर्वी सर्वोत्तम विक्रम भूतानच्या सोनम येशेच्या नावावर होता. ज्याने २०२५ मध्ये पुरुषांच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात म्यानमारविरुद्ध केवळ सात धावांत आठ बळी घेतले होते. कार्डोसोने २०२४ मध्ये इंडोनेशियाच्या रोहमालियाचा ७/० चा विक्रम मोडून महिलांच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. हा विक्रम आता केवळ १० बळी घेऊनच मोडला जाऊ शकतो, जे शक्य असले तरी अत्यंत कठीण आहे.
सामन्यात काय घडले?
रॉबर्टा एव्हरीच्या ३५ चेंडूंत ४८ धावा आणि मोनिक मचाडोच्या ४१ चेंडूंत नाबाद ६९ धावा या शानदार खेळीच्या जोरावर ब्राझीलने २०२ धावांचा डोंगर उभा केला. कार्डोसोच्या प्रभावी गोलंदाजीची सुरुवात दुसऱ्याच षटकात झाली, जेव्हा तिने हॅटट्रिक घेतली. त्यानंतर तिने चौथ्या षटकात आणखी चार बळी घेत तिच्या विकेटची संख्या सातवर नेली. सहाव्या षटकात तिने आणखी दोन बळी घेत एका सामन्यात ९ बळी घेण्याचा नवा विक्रम बनवला. अखेरची विकेट मारियान आर्डरने घेतली आणि लेसोथोचा संघ ६.२ षटकांत केवळ १३ धावांवर सर्वबाद झाला. ज्यामुळे ब्राझीलचा १८९ धावांनी मोठा विजय झाला.