नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) ऑनलाईन पद्धतीने विशेष वार्षिक सभा शनिवारी होणार असून, यामध्ये स्थगित झालेल्या आयपीएलचे वेळापत्रक,  टी-२० विश्वचषक आयोजन आणि रणजी क्रिकेटपटूंचे थकीत मानधन यावर मुख्य चर्चा होण्याची शक्यता आहे. स्थगित झालेल्या आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे आयोजन १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरदरम्यान यूएई येथे करण्याचा निर्णय या वेळी घेतला जाऊ शकतो.
या बैठकीमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन आणि गेल्या सत्रातील रद्द करण्यात आलेल्या रणजी स्पर्धेतील देशांतर्गत क्रिकेटपटूंसाठी आर्थिक पॅकेजबाबतही चर्चा होईल. टी-२० विश्वचषक भारतातच आयोजित करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. १ जूनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) बैठकही होणार असून, त्याआधी भारतातील कोरोना स्थितीबाबतची माहिती जाणून घेण्याचे बीसीसीआयने आयसीसीला 
सांगितले आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘या बैठकीत मुख्य मुद्दा आयपीएलच असेल. आम्ही अंतिम सामन्यासह चार प्ले ऑफ लढती, दहा डबल हेडर (एकाच दिवशी दोन लढती) व सात सिंगल हेडर (एका दिवशी एक लढत) अशी अपेक्षा करीत आहोत’