ढाका: आगामी टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या यजमानपदावरून आणि सुरक्षेच्या कारणावरून सुरू असलेल्या वादात बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर काढल्यानंतर आता बांगलादेश क्रिकेट बोर्डात अंतर्गत खळबळ माजली आहे. बीसीबीचे संचालक आणि गेम डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष इश्तियाक सादेक यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
इश्तियाक सादेक यांनी आपला राजीनामा पत्रात 'वैयक्तिक आणि कौटुंबिक' कारणांचा उल्लेख केला आहे. "गेम डेव्हलपमेंट सारख्या मोठ्या विभागासाठी मी पूर्ण वेळ देऊ शकत नसल्याने मला या पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे मला वाटते," असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, बांगलादेशला वर्ल्ड कपमधून बाहेर काढले गेल्याच्या त्याच दिवशी हा राजीनामा आल्याने क्रिकेट वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. सादेक यांनी मात्र बोर्डाशी कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे.
बांगलादेशची हतबलता
दुसरीकडे, बीसीबीने आयसीसीच्या निर्णयाला आव्हान न देण्याचे ठरवले आहे. बोर्डाचे माध्यम समिती अध्यक्ष अमजद हुसैन यांनी सांगितले की, "आम्ही आयसीसीचा निर्णय स्वीकारला आहे. भारत सोडून इतर देशात सामने खेळवण्याची आमची विनंती अमान्य करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आम्ही कोणताही कायदेशीर लढा देणार नाही."
भारतात खेळण्यास नकार दिल्याने आयसीसीने बांगलादेशच्या जागी आता स्कॉटलंड संघाचा समावेश केला आहे. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत आता बांगलादेश दिसणार नाही, हे आता निश्चित झाले आहे.