अहमदाबाद : ‘वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी मोठी जिद्द दाखवली. आमची फलंदाजी योग्य होती. भविष्यातही संघाकडून अशीच फलंदाजी होईल,’ असे भारताचा भरवशाचा फलंदाज सूर्यकुमार यादव याने सांगितले.
पहिल्या सामन्यात भारताने केवळ २८ षटकांमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग केला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला सूर्यकुमार म्हणाला की, ‘संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली असती, तर ते आव्हानात्मक ठरले असते असे मला नाही वाटत. आम्ही परिस्थितीनुसार सहज खेळ केला. मागच्या सामन्याप्रमाणेच फलंदाजी आम्ही कायम ठेवू. फरक फक्त एवढाच आहे की, प्रथम फलंदाजी करताना आम्हाला मोठी आणि भक्कम धावसंख्या उभारावी लागेल. यासाठी आम्हाला अखेरपर्यंत फलंदाजी करावी लागेल. पहिल्या सामन्यातील आमची फलंदाजी योग्य होती.’
सूर्यकुमार पुढे म्हणाला की, ‘आम्ही धावांचा पाठलाग करताना धावगती चांगली राखली. खेळाडूंची जिद्द आणि इरादे स्पष्ट होते. त्यामुळे बदल करण्याची गरज दिसत नाही. मला म्हणायचंय की, कोणत्याही दडपणाशिवाय आपला खेळ खेळण्याची गरज आहे.’ मर्यादित षटकांच्या सामन्यांत सूर्यकुमारने तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानी फलंदाजी केली आहे. विंडीजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो पाचव्या क्रमांकावर खेळला होता. याबाबत सूर्यकुमार म्हणाला की, ‘पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणे वेगळा अनुभव आहे. मी सर्व क्रमांकावर फलंदाजी करतोय आणि याबाबतीत मी लवचिक आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार कोणत्याही स्थानी फलंदाजी करण्यास मी सज्ज आहे.’