Bangalore Stampede Cause: बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात पोलिसांनी रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरूसह इतर काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चेंगराचेंगरीचे प्रकरणात नवीन माहिती समोर आली असून, यात आरसीबीकडून झालेल्या चुका चव्हाट्यावर आल्या आहेत. यातील महत्त्वाची चूक म्हणजे पोलीस प्रशासनाची परवानगी मिळण्यापूर्वीच आरसीबीने विजयी रॅलीची घोषणा केली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बंगळुरूतील क्यूबॉन पार्क पोलीस ठाण्यात आरसीबी, डीएनए (ईव्हेंट मॅनेजर), केएससीए प्रशासकीय कमिटी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम १०५,१२५ (१)(२), १३२, १२१ (१), १९० नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची परवानगी मिळण्याआधीच विजयी रॅलीची घोषणा
३ जून रोजी आयपीएलचा अंतिम सामना झाला. पण, त्यापूर्वीच आरसीबीने बंगळुरू शहर पोलिसांशी संपर्क केला होता. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयी रॅली काढण्याची परवानगी पोलिसांकडे मागितली होती.
वाचा >>चेंगराचेंगरीतील मृतांच्या वारसांना RCB टीमकडून प्रत्येकी १० लाखांची मदत, त्याशिवाय...
दरम्यान, पोलिसांकडून विजयी रॅलीची परवानगी मिळण्यापूर्वीच आरसीबीने एक्स मीडियावर एक पोस्ट करत रॅलीची घोषणा करून टाकली. आरसीबीच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून करण्यात आलेली ही पोस्ट आता व्हायरल होत आहे.
आरसीबीच्या त्या पोस्टमुळे वाढली गर्दी?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरबीसीने सोशल मीडियावर केलेल्या त्या पोस्टमुळेच गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी आरसीबी व्यवस्थापनाला ४ रोजी विजयी रॅली न काढण्याचा सल्ला दिला होता. पण, आरसीबीने ४ जून रोजी सोशल मीडियावर पोस्ट करून ठिकाण आणि वेळेची घोषणा करून टाकली.
मोफत पास मिळण्याची घोषणा
आरसीबीने मोफत प्रवेश पास देण्याची घोषणाही केली होती, त्यामुळेच ही परिस्थिती ओढवली असेही सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी आरसीबीकडे विजयी रॅली रविवारी काढण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे कोंडी टळेल आणि कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दिलेल्या सल्ल्याकडे राज्य सरकारनेही दुर्लक्ष केले.