भारतीय क्रिकेट संघाचा टी-२० उपकर्णधार आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल याने आयपीएलमधील वादग्रस्त इम्पॅक्ट प्लेयर नियमावर कडक शब्दांत टीका केली. हा नियम अष्टपैलू खेळाडूंच्या प्रगतीसाठी घातक असल्याचे सांगत अक्षरने रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्या सुरात सूर मिसळला आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यापूर्वी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अक्षरने आपले मत स्पष्ट मांडले. तो म्हणाला की, "मला हा नियम अजिबात आवडत नाही. मी स्वतः एक अष्टपैलू खेळाडू असल्याने मला त्याची झळ बसते. पूर्वी संघात स्थान मिळवण्यासाठी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही येणे आवश्यक होते. मात्र, आता संघ व्यवस्थापन अष्टपैलू खेळाडूऐवजी एका विशेष फलंदाज किंवा गोलंदाजाला प्राधान्य देते. या नियमामुळे आम्हाला अष्टपैलू खेळाडूची गरजच काय? अशी मानसिकता तयार होत आहे."
अक्षर पटेल हा या नियमावर टीका करणारा पहिला खेळाडू नाही. यापूर्वी अनेक भारतीय दिग्गज खेळाडूंनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान, २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने म्हटले होते की, या नियमामुळे भारतीय क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा येत आहे. तर, मुंबईचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याच्या मते, या नियमामुळे संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून निवडले जाणे आता अत्यंत कठीण झाले आहे. कारण संघाकडे अतिरिक्त खेळाडूचा पर्याय उपलब्ध असतो.
इम्पॅक्ट प्लेयर नियम नक्की काय आहे?
इम्पॅक्ट प्लेयर हा नियम २०२३ मध्ये आयपीएलमध्ये लागू करण्यात आला. सामन्यादरम्यान संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमधील कोणत्याही खेळाडूच्या जागी पाच पर्यायी खेळाडूंपैकी एकाला मैदानात उतरवू शकतात. बीसीसीआयच्या निर्णयानुसार, हा नियम किमान २०२७ पर्यंत कायम राहणार आहे. हा नियम प्रेक्षकांसाठी सामना अधिक रोमांचक बनवत असला तरी ऑलराउंडरवर खेळाडूवर त्याचा नकारात्मक परिणाम होत असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.