Join us

बांगलादेशात ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमच्या बसवर हल्ला, खेळाडूंच्या सुरक्षेत वाढ

बांगलादेशविरोधातील कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर हॉटेलला परतणा-या ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमच्या बसवर हल्ला करण्यात आला होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 16:43 IST

Open in App

ढाका, दि. 5 - बांगलादेशविरोधातील कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर हॉटेलला परतणा-या ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमच्या बसवर हल्ला करण्यात आला होता. 27 ऑगस्ट रोजी हा हल्ला झाला होता. बसवर अज्ञात व्यक्तीने दगड फेकला होता. यामुळे बसच्या खिडकीची काच फुटली, मात्र सुदैवाने कोणताही खेळाडू जखमी झाला नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यासंबंधी माहिती दिली आहे. बांगलादेशने चौथ्या दिवशीच इतिहास घडवत 20 धावांनी हा सामना जिंकला होता.

या घटनेचा तपास केला जात असून, खेळाडूंच्या सुरक्षेसाठी योग्य ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे व्यवस्थापक सीन कॅरोल यांनी सांगितलं आहे की, 'स्टेडिअमहून हॉटेलकडे जात असताना कोणीतरी बसच्या दिशेने दगड फेकला, ज्यामुळे बसच्या खिडकीची काच फुटली. या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही'. 

'स्थानिक सुरक्षा अधिका-यांसोबत सुरक्षेसंदर्भात चर्चा केली जात आहे. या घटनेचा तपासही केला जात आहे. बांगलादेश अधिका-यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. यामुळे स्टेडिअमपासून ते हॉटेलपर्यंतच्या रस्त्यावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे', अशी माहिती सीन कॅरोल यांनी दिली आहे. 

यासंबंधी प्रतिक्रिया देताना बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सांगितलं आहे की, 'या घटनेकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे. घटनेचा तपास करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून एक समिती गठीत करण्यात आली आहे'. 

पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत इतिहास घडवला आहे. आपल्या दमदार फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांना जेरीस आणणारे मॅट रेनशॉ, उस्मान ख्वाजा आणि स्टिव्ह स्मिथ सारखा चिवट फलंदाजी करणारा कर्णधार डावात असतानाही बलाढ्य ऑस्ट्रेलिया बांगलादेशच्या फिरकीपटूंनी इतिहास घडविला. शाकिब अल हसन आणि तैजूल इस्लाम यांच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा निभाव लागला नाही. चौथ्या दिवशी विजय मिळवता मिळवता 20 धावांनी टीम ऑस्ट्रेलिया ढेर झाली. डेव्हिड वॉर्नरने तडकावलेले शतक तेवढे ऑस्ट्रेलियाची लाज राखून गेले. बांगलादेशने ऑस्ट्रेलियासमोर 265 धांवाचे माफक आव्हान ठेवले होते. शिवाय अखेरचे दोन-अडीच दिवसही ऑस्ट्रेलियाच्या हाती होते. पण, एवढी धावसंख्याही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना पार करता आली नाही. 

17 सप्टेंबरपासून भारत - ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. याशिवाय तीन टी-20 सामनेही होणार आहेत. 7 ऑक्टोबरपासून टी-20 सामन्यांना सुरुवात होईल. 

श्रीलंका संघावर झाला होता दहशतवादी हल्ला- 

2009 सालच्या पाकिस्तान दौ-यात श्रीलंका संघावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. सकाळच्या वेळी खेळाडू बसने स्टेडियमकडे निघाले असताना दहशतवाद्यांनी बसवर अंदाधुंद गोळीबार केला होता. यामध्ये सहा पाकिस्तान पोलीस ठार झाले तर, काही खेळाडू जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर झिम्बाब्वे वगळता एकाही देशाने पाकिस्तानचा दौरा केला नाही. 

टॅग्स :आॅस्ट्रेलियाक्रिकेट