Irfan Pathan slams Pakistan cricketers, IND vs PAK Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला गट फेरीपाठोपाठ सुपर-४ फेरीतही पराभवाची धूळ चारली. रविवारी रंगलेल्या सुपर-४ च्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ६ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने फरहानच्या ५८ धावांच्या जोरावर १७१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना, भारतीय सलामीवीरांनी शतकी सलामी दिली. अभिषेक शर्माने ७४ तर शुबमन गिलने ४७ धावांची खेळी केली. या सामन्यादरम्यान, पाकिस्तानी खेळाडू मुद्दामून भारतीय फलंदाजांशी बाचाबाची, वाद घालण्याचा प्रयत्न करत होते. पण भारतीय खेळाडूंनी आपल्या खेळाने त्यांना उत्तर दिले. जेव्हा पाकिस्तानी खेळाडू खूपच आक्रमक झाले तेव्हा अभिषेक शर्मा व शुबमन गिल यांनीही आक्रमक होत मैदानावर बाचाबाची केली. पण अखेर भारताने आपल्या खेळीच्या जोरावर विजय मिळवला. याच प्रकारावर भारतीय माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने आपले मत मांडले.
"भारत - पाकिस्तानचा सामना झाला. त्यात भारताने खूपच सहज विजय मिळवला. आपण कसे जिंकलो हे कुणालाही सांगायची गरजच नाही. आपला खेळच सारंकाही बोलून गेला. भारतीय संघ जिंकतो आणि पुढे जात राहतो ही टीम इंडियाची कमाल आहे. पण सामन्याच्या वेळी पाकिस्तानी खेळाडूंकडून खूपच आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. खूप बाचाबाची झाल्याचे दिसले. अभिषेक शर्माही म्हणाला की पाकिस्तानी खेळाडू अशी बडबड करत होते, जे त्यांना बोलायला नको होतं. म्हणूनच भारताने स्पष्ट संदेश दिला की, तुम्ही जेवढी बडबड कराल, तेवढे आम्ही विजयी होऊ आणि पुढे जात राहू," असे इरफान पठाणने पाकिस्तानला सुनावले.
"आम्ही भारतीय खेळाडू आहोत. आम्हाला डिवचू नका. आम्ही अतिशय शांतपणे क्रिकेट खेळणारे खेळाडू आहोत. आम्ही मुद्दामून कुणाच्याही वाटेला जात नाही. पण प्रतिस्पर्धी संघाने उगाचच आमच्याशी पंगा घेतला तर मात्र आम्हाला उत्तर देता येतं. तुम्ही काहीही आणि कशीही बडबड केलीत तरीही भारतीय खेळाडू गप्प राहतील या गैरसमजात राहू नका. कारण जर तुम्ही पातळी सोडून वागायला लागलात, तर आमच्या भारतीय संघाचे क्रिकेटपटू तुम्हाला जशास तसं उत्तर देऊ हे लक्षात ठेवा. मग त्यावेळी आम्ही केवळ बॅटनेच उत्तर देऊ असे नाही, तर आम्ही मैदानातही समोरासमोर उत्तर देऊ," असा इशारा इरफानने दिला.