Asia Cup 2022 Final Sri Lanka beat Pakistan : भारतासारखा तगडा प्रतिस्पर्धी स्पर्धेतून बाहेर गेल्यानंतर पाकिस्तानच आशिया चषक उंचावेल असा समज चाहत्यांनी करून घेतला होता. त्यामुळेच बाबर आजमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेताच सोशल मीडियावर पाकिस्तानी संघाच्या अभिनंदनाचा ट्रेंड सुरू झाला. श्रीलंका चमत्कार करेल असे कुणालाही वाटले नव्हते, त्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा ( Ramiz Raja) यांचाही समावेश होताच... पण, श्रीलंकेनं चमत्कार केला अन् पाकिस्तानला धुळ चाखवून ८ वर्षांनी आशिया चषक उंचावला. पाकिस्तानचा पराभव रमीझ राजा पचवू शकले नाही आणि त्याचा राग त्यांनी भारतीय पत्रकारावर काढला...
आशिया चषक फायनलनंतर रमीझ राजा यांच्याशी पत्रकारांनी स्टेडियमबाहेर संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी भारतीय पत्रकाराचा अपमान केला आणि त्याच्याकडून फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. श्रीलंकेने २३ धावांनी सामना जिंकून पाकिस्तानला उप विजेतेपदावर समाधान मानण्यास भाग पाडले. यावेळी पत्रकारांनी रमीझ राजा यांना पाकिस्तानी जनतेसाठी काही संदेश देणार का? असा प्रश्न विचारला. त्या पत्रकाराने 'आवाम' ( सामान्य माणूस) हा शब्द वापरला. त्यावर रमीझ राजा भडकले. भारतीय पत्रकार त्यांना समजावत होता की त्यांचा अपमान करण्याचा त्याचा मानस नव्हता, तरीही रमीझ राजा ऐकले नाही. त्यांनी त्याचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला.
नेमका संवाद काय घडला ते वाचा
- पत्रकार - आवाम बडी नाखुश है, उनके लिए कोई संदेश? ( पराभवामुळे लोकं नाराज आहेत, त्यांच्यासाठी काही संदेश?)
- रमीज राजा - देखिए आप इंडिया से होंगे, आपकी आवाम तो बहुत खुश होंगे ( तुम्ही भारतीय असाल, तुमची लोकं तर खूप आनंदी असतील)
- पत्रकार- आम्ही आनंदी नाही
- रमीझ राजा - कोण लोकं?
- पत्रकार - पाकिस्तानी चाहत्यांना मी रडताना पाहिलंय. मी काही चुकीचं म्हटलं का?
श्रीलंकने २३ धावांनी विजय मिळवला. प्रमोद मदुशान ( ४-३४) आणि वनिंदू हसरंगा ( ३-२७) यांनी ७ विकेट्स घेत पाकिस्तानचा संपूर्ण संघ १४७ धावांत तंबूत पाठवला. भानुका राजपक्षाने ७१ धावांची खेळी करताना व हसरंगासोबत ५८ धावांची भागीदारी करून ५ बाद ५८ अशा अवस्थेत असणाऱ्या श्रीलंकेला ६ बाद १७० धावांपर्यंत मजल मरून दिली. राजपक्षाने ४५ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७१ धावा केल्या.