Join us
Daily Top 2Weekly Top 5

MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सला १४ सामन्यांत फक्त ४ विजय मिळवून ८ गुणांसह स्पर्धेचा निरोप घ्यावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 15:06 IST

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सला १४ सामन्यांत फक्त ४ विजय मिळवून ८ गुणांसह स्पर्धेचा निरोप घ्यावा लागला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली यंदा MI खेळले आणि फ्रँचायझीची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. काल वानखेडे स्टेडियमवर अखेरच्या साखळी सामन्यात त्यांना लखनौ सुपर जायंट्सकडून १८ धावांनी पराभव पत्करावा लागला आणि ते गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिले. आयपीएलच्या पुढील पर्वासाठी मेगा ऑक्शन होणार आहे आणि रोहित शर्मा दुसऱ्या फ्रँचायझीकडून खेळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच कालच्या शेवटच्या सामन्यानंतर MI कोच मार्क बाऊचर यांनी रोहितला थेट प्रश्न केला.. आता पुढे काय?

वानखेडेवरील कालचा हा सामना हा रोहितचा मुंबईच्या फ्रँचायझीकडून शेवटचाच असल्याची गाठ मनाशी पक्की करून चाहते स्टेडियमवर आले होते. रोहित जेव्हा बाद झाला, तेव्हा सर्वांनी जागेवर उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला. जणू रोहितचा हा निरोपाचा सामना आहे. भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर यानेही ट्विट केलं की, रोहितचा हा मुंबई इंडियन्सकडून शेवटचा सामना आहे, असा भास होतोय.. या सामन्यानंतर बाऊचर यांनी म्हटलं की, माझ्यासाठी, तो त्याच्या नशिबाचा मालक आहे. पुढच्या वर्षी मेगा ऑक्शन होणार आहे आणि कोण जाणे त्यात काय होईल? 

 रोहितने LSG विरुद्धच्या सामन्यात ३८ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ६८ धावा केल्या. त्याच्या कामगिरीबद्दल बोलताना बाऊचर म्हणाले, रोहितसाठी हा हंगाम दोन भागांचा राहिला... त्याने सुरुवात चांगली केली आणि चेंडू चांगले टोलावले. पण, दुसऱ्या टप्प्यात त्याला किंचीत अपयश आले. माझी काल रात्री रोहित शर्माशी चर्चा झाली. आम्ही यंदाच्या हंगामाचा आढावा घेतला. त्यानंतर, मी त्याला विचारले की पुढे काय आहे? आणि रोहित म्हणाला 'वर्ल्ड कप'.

रोहितने यंदाच्या पर्वात मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक ४१७ धावा केल्या, त्यात १ शतक व १ अर्धशतकही आहे. त्यानंतर तिलक वर्मा ( ४१६), सूर्यकुमार यादव ( ३४५), इशान किशन ( ३२०) यांचा क्रम येतो.  कालच्या सामन्यात काय घडलं?नाणेफेक जिंकल्यानंतर MIने प्रथम गोलंदाजी स्वीकारली.  लोकेश राहुल (५५ धावा) आणि निकोलस पूरन ( ७५ धावा) यांच्या फटकेबाजीने संघाला ६ बाद २१४ धावांपर्यंत पोहोचवले. लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा ( ६८ धावा) आणि डेवाल्ड ब्रेव्हिस ( २०) यांची ८८ धावांची भागीदारी तुटल्यानंतर मुंबईच्या फलंदाजांनी रांग लावली.  नमन धीरच्या (२८ चेंडूत ६२* धावा, ४ चौकार आणि ५ षटकार) जबरदस्त खेळीमुळे मुंबईला आशा दाखवली होती. पण, त्यांची १८ धावेने हार झाली.  

टॅग्स :आयपीएल २०२४मुंबई इंडियन्सरोहित शर्मा