मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि अष्टपैलू क्रिकेटर अर्जुन तेंडुलकर याने गोवा संघाकडून रणजी क्रिकेट स्पर्धेतील यंदाच्या हंगामात महाराष्ट्र संघाविरुद्ध 'अर्धशतकी' डाव साधला आहे. महाराष्ट्र विरुद्धच्या सामन्यात त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ५० विकेट्सचा टप्पा पार केला. विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा मुलगा एवढ्या पुरती ओळख मर्यादित न राहता क्रिकेटच्या मैदानात स्वत:चं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तो जीव तोडून मेहनत घेताना दिसतोय. पण फलंदाजीसह गोलंदाजीत धमक असूनही तो खास छाप सोडण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळेची प्रथम श्रेणीतील त्याची ही कामगिरी त्याच्या पुढच्या प्रवासासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरू शकतो. एवढेच नाही तर प्रथम श्रेणीत तो वडिलांच्या खास विक्रमाचाही पाठलाग करतोय. जाणून घेऊयात या खास विक्रमाबद्दल....
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अर्जुन तेंडुलकरचे रणजीत विकेट्सचं 'अर्धशतक' अन्...
अर्जुन तेंडुलकरने २०२२-२३ च्या रणजी हंगामातून गोवा संघाकडून पदार्पण केले होते. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने राजस्थानविरुद्ध शतक झळकावले होते. याशिवाय, गोव्यासाठी त्याने फाइव्ह-विकेट हॉलचा डावही साधला आहे. यंदाच्या हंगामातील महाराष्ट्र विरुद्धच्या सामन्यात रोहन कुनूमलला याची विकेट घेत अर्जुन तेंडुलकरने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ५० विकेट्सचा टप्पा गाठला. येत्या काळात तो रणजीत आपल्या वडिलांचा विक्रमही मागे टाकू शकतो.
T20 World Cup 2026 : टीम इंडियासह 'या' संघात ३०० धावा करण्याची ताकद; रवी शास्त्रींची मोठी भविष्यवाणी
रणजीत सचिन तेंडुलकरच्या खात्यात किती विकेट?
क्रिकेटमधील महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने आपल्या कारकिर्दीत फलंदाजीशिवाय गोलंदाजीतही खास छाप सोडली आहे. रणजी सामन्यात सचिन तेंडुलकरनं ८१ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे. अर्जुन तेंडुलकर या विक्रमापासून अजून खूप मागे असला तरी तो प्रमुख गोलंदाजाच्या रुपात खेळत असल्यामुळे येत्या काळात २१ विकेट्स घेत त्याच्याकडे हा विक्रम मागे टाकण्याची निश्चितच संधी असेल.
IPL मध्येही नव्या संघाकडून उतरणार मैदानात
अर्जुन तेंडुलकर याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचा संघ सोडून गोव्याचा रस्ता धरला होता. त्यानंतर यंदाच्या IPL हंगामात तो लखनौच्या संघाकडून या लीग स्पर्धेत नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. २०२३ मध्ये IPL मध्ये पदार्पण केल्यापासून तो MI कडून फक्त ५ सामने खेळला यात त्याने ३ विकेट्स घेतल्या. आता संघ बदलल्यावर LSG कडून त्याला किती संधी मिळणार? आपली छाप सोडण्यात तो यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.