India vs Bangladesh : भारतीय संघाला दुसऱ्या वन डे सामन्यात बांगलादेशकडून ५ धावांनी हार मानावी लागली होती. शार्दूल ठाकूरच्या विकेटनंतर भारतीयांनी विजयाच्या आशाच सोडल्या होत्या. पण, अचानक रोहित शर्मा ( Rohit Sharma) फलंदाजीला आला. बांगलादेशच्या डावातील दुसऱ्या षटकात रोहितने दुखापतीमुळे मैदान सोडले होते. डाव्या अंगठ्याच्या स्कॅनसाठी त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते... तो ड्रेसिंग रुममध्ये परतला तो बोटावर पट्टी बांधूनच.. त्यामुळे रोहितला फलंदाजीला पाहून भारतीयांना धीर मिळाला. बांगलादेशचे चाहते मात्र तणावात गेले. रोहितने एका हाताने जसे जमेल तसे उत्तुंग फटके मारले अन् अखेरच्या चेंडूपर्यंत बांगलादेशला तव्यावर ठेवले...
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित प्रथमच ९ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने आता भारताकडून ८ वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. मागच्या वेळेत २०१४साली अफगाणिस्तान विरुद्ध मिरपूरच्या याच स्टेडियमवर तो सलामीसोडून दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. रोहित फलंदाजीला आला तेव्हा भारताला विजयासाठी ४२ चेंडूंत ६४ धावांची गरज होती. बोट दुखत असूनही रोहितने ४६व्या षटकात इबादतला ६,६,४ असे धुतले.
४९व्या षटकात रोहितचे दोन झेल सोडले आणि बांगलादेशचे चाहते भडकले. अखेरच्या चेंडूवर मोहम्मद सिराजला ( २) बाद करून बांगलादेशने भारताचे टेंशन वाढवले. भारताला ६ चेंडूंत २० धावा करायच्या होत्या. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर रोहितने सलग दोन चौकार खेचले. त्यानंतर एक चेंडू निर्धाव गेल्यानंतर खणखणीत षटकार खेचून रोहितने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. एक चेंडूंत ६ धावा हव्या असताना रोहितचा फटका चूकला अन् बांगलादेशने ५ धावांनी सामना जिंकला. रोहितने २८ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ५१ धावा केल्या. भारताला ९ बाद २६६ धावाच करता आल्या. सिराजने ४९वे षटक निर्धाव जाऊ दिले नसते तर सामना भारताने जिंकला असता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"