लखनौ - अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने तडाखेबंद अर्धशतक झळकावत मुंबईच्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतील रेल्वे विरुद्धच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. रहाणेच्या जोरावर मुंबईने अ गटात विजयी सलामी देताना रेल्वेला ७ गड्यांनी नमवले. मुंबई आता शुक्रवारी विदर्भ संघाविरुद्ध खेळेल.
इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईने रेल्वेला २० षटकांत ५ बाद १५८ धावांवर रोखले. हे लक्ष्य मुंबईने १५.५ षटकांमध्येच ३ बाद १५९ धावा काढून सहज पार केले. सलामीवीर रहाणेने ३३ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६२ धावांचा तडाखा दिला. तो कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर स्वयंचीत (हिटविकेट) होऊन तंबूत परतला.
आयुष म्हात्रे व रहाणे यांनी ३५ चेंडूंत ६२ धावांची सलामी दिली. आयुष (१८) बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने ३० चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४७ धावा काढल्या. त्याने रहाणेसोबत ५१ धावांची भागीदारी केली. हार्दिक तामोरे (नाबाद २३) व शिवम दुबे (नाबाद ५) यांनी मुंबईच्या विजयावर शिक्का मारला. त्याआधी, गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर मुंबईने रेल्वेला मर्यादित धावसंख्येत रोखले. आशुतोष शर्माने ३० चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६१ धावा फटकावल्याने रेल्वेला समाधानकारक मजल मारता आली. मोहम्मद सैफनेही (३७ चेंडूंत ४८ धावा) उपयुक्त खेळी केली.